इंदापूर तालुक्यातील सहा हजार एकर बागा बाधित : बागायतदार शेतकरी अडचणीत
नीलकंठ मोहिते
रेडा – इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी जुनी पीक पद्धती बदलून फळबागा लागवडी केल्या आहेत. फळबागा फुलवल्या आहेत. मात्र, अवकाळी पावसाच्या तडाख्याने तालुक्यातील तब्बल सहा हजार एकर द्राक्षबागेचा हंगाम मातीमोल झाला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एकरी द्राक्ष बाग जोपासण्यासाठी केलेला एका हंगामाचा खर्च किमान तीन लाख रुपये, असा आहे. यात सहा हजार एकरातील एकूण खर्च 180 कोटी रुपये इतका झाला आहे. त्यामुळे हा खर्च पाण्यातच गेला आहे.
इंदापूर तालुक्यातील बोरी, काजड, शिंदेवाडी, कळस, भरणेवाडी, अंथुर्णे, निमगाव केतकी, काटी, वरकुटे, शेटफळ हवेली, उजनी बॅकवॉटरच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड केली आहे. द्राक्षाचे क्षेत्र सहा हजार एकरपर्यंतचे आहे. परतीच्या पावसाने द्राक्षबागांवर मोठा परिणाम झाला आहे. फळकुज लागली आहे. द्राक्ष घड फुलवणारी मुळे नेस्तनाबूत झाली आहेत. यंदा द्राक्षबागेत फळाचे प्रमाण जास्तीचे होते. त्यामुळे हमखास उत्पन्न मिळण्याचा अंदाज होता. शेतकऱ्यांनी एकरी तीन लाख रुपयांचा खर्च केला होता.पावसाच्या तडाख्याने द्राक्ष डॅमेज झाली आहेत. डावणी, बुरी हा रोग आला आहे. शेतकरी पुढचा हंगाम हाती लागावा म्हणून बागेतील घाण बाहेर काढत आहेत. ज्या द्राक्षबागा तडाख्यातून वाचल्या आहेत. त्या द्राक्षवेलाची निगा राखली जात आहे. पाने गळू नयेत जाऊ नयेत यासाठी शेतकरी बोर्डो फवारणी करीत आहे. काही भागात द्राक्ष शेतीमध्ये घड मोठे दिसत आहेत. मात्र, द्राक्षाला काळा डाग लागला असल्यामुळे द्राक्ष परिपक्व होईल की नाही, या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे.
एका हंगामामध्ये द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी शेतकरी औषध फवारणी, मजुरी, खत, शेणखत याचा मुलामा सातत्याने द्राक्ष बागेला देत असतो, द्राक्ष फळधारणा झाल्यानंतर किमान चार ते पाच महिन्यांचा हे पीक असते. इंदापूर तालुक्यात नानासाहेब पर्पल, जम्बो शरद, सीडलेस, कृष्णा, सरिता तर व्हाईट द्राक्षांमध्ये माणिक चमन, सोनाका, आर के, आदी प्रकारच्या जातीच्या बागा शेतकऱ्यांनी जोपासल्या आहेत. द्राक्षबागांचा पीकविमा उतरविला आहे. खिशात पैसा नसतानाही उसनवारी करून रक्कम संबंधित विमा कंपनीला दिल्या आहेत. मात्र, हा विमा ऑक्टोबर, सप्टेंबरपासून भरण्यासाठी घोषणा आवश्यक होती. ती न झाल्यामुळे विमा भरलेल्या शेतकऱ्यांना एक दमडीही रक्कम मिळणार नाही. या तारखेअगोदरच द्राक्ष शेती भुईसपाट झाल्या आहेत.
शासन हे विमा कंपन्यांना बोलावून टेंडर पद्धतीने विमा उतरवण्याचे काम देत असते. तरी हे निर्णय शासन स्तरावरून घेत असताना देखील शेतकऱ्यांच्या हिताचे ठरत नाहीत. द्राक्षबागेसाठी प्रति एकर 6 हजार 160 रुपये विमा शेतकऱ्यांना उतरायला लावला. यासंदर्भात आम्ही पुणे जिल्हाधिकाऱ्यांना विमा भरण्याची घोषणा ऑक्टोबर ते सप्टेंबर महिन्यामध्ये करण्यात यावी, द्राक्षाचा विमा हा वार्षिक असला पाहिजे, अशी मागणी केली होती. परंतु या मागणीचा विचार झाला नाही. त्यामुळे फळपीक विमा योजना फोल ठरली.
– अशोक पाटील, माजी संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.
इंदापूर तालुक्यामध्ये ज्या द्राक्ष बागायतदारांनी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान छाटणी केल्या होत्या. त्या छाटण्या जवळपास 70 टक्के झालेल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील 70 टक्के द्राक्ष बागा अवकाळीच्या तडाख्यामुळे बाधित झाल्या आहेत. त्यामुळे शासनस्तरावरून शेतकऱ्यांना किमान एकरी द्राक्ष बागेसाठी झालेला अडीच ते तीन लाख रुपये खर्च नुकसानभरपाई म्हणून दिली जावी, अशी आमची अपेक्षा आहे. अडचणीच्या काळात द्राक्ष बागायतदारांच्या पाठिशी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ खंबीरपणे उभा राहणार आहे.
– भारत शिंदे, मानद सचिव, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.
इंदापूर तालुक्यामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. फळबागांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी एकरी 18 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. परंतु तीन लाखांचा खर्च शेतकऱ्यांनी केला असताना शेतकऱ्यांना ही मदत तुटपुंजी मिळाली आहे. नुकसानग्रस्त द्राक्षबागेतील कचरा सुद्धा इतक्या छोट्या रकमेत उचलला जाणार नाही.
– पोपट ढोले, द्राक्षबागायतदार, लाखेवाडी.