मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा निर्णय जवळपास लिहून दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 बंडखोर आमदार अपात्र ठरणार हे निश्चित आहे, असे शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी बुधवारी स्पष्ट केले.
सरकार पडणार असल्याचे ठावूक असल्यामुळेच भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. परब पुढे म्हणाले, शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी गुरुवारपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. तसेच त्याचा अर्थही लावला आहे. आता केवळ निर्णय येणे बाकी आहे.
यामुळे हे सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांची भूमिका, घटनेतील 10 वे कलम आदी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे आमदार अपात्र ठरणे म्हणजे सरकार कोसळणे आहे. अन्य 23 आमदारांची याचिका प्रलंबित असल्यामुळे हा केवळ वेळकाढूपणा आहे, असेही परब म्हणाले.
मराठा समाजाला त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय शाश्वत आरक्षण मिळणार नाही. यासाठी योग्य इम्पेरिकल डेटा मागास आयोगाने देणे गरजे असल्याचेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या कुणबी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होऊन सामाजिक आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे, असेही परब यावेळी म्हणाले.