ढाका – बांगलादेशात एका लग्नाच्या वऱ्हाडावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशाच्या वायव्येकडील चापनवाबगेज जिल्ह्यात एका बोटीवर लग्नाची पार्टी सुरू असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये या सोहळ्यातील अन्य जणांबरोबर नवऱ्यामुलाचाही मृत्यू झाला आहे.
या बोटीवर अनेक वेळा वीज पडली आणि त्यामध्ये 16 जण ठार झाले असे मुख्य प्रशासकीय अधिकारी साकिब अल रब्बी यांनी शिबागंज येथे पत्रकारांना सांगितले. याप्रसंगी नवरी मुलगी उपस्थित नव्हती. त्यामुळे ती बचावली, असेही त्यांनी सांगितले.
अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडायला सुरूवात झाल्यामुळे बोटीतील अनेकजणांनी एक एक करत किनारा गाठायला सुरुवात केली होती. त्यातच नवरी मुलगी देखील किनाऱ्याकडे गेली होती. त्यामुळे ती बचावली. पण अन्य 11 जणांबरोबर ती देखील जखमी झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वीज पडल्यामुळे जखमी झालेल्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बांगलादेशात पावसाळ्यात दरवर्षी शेकडो जण वीज पडल्यामुळे ठार होतात. बांगलादेशात 2016 मध्ये वीज पडण्याची आपत्ती नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे. मात्र अशा बऱ्याच दुर्घटनांमधील मृत्यूंची नोंद देखील केली जात नाही. 2016 मध्ये अशा घटनांमध्ये 200 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 82 जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता.