नगर – जिल्ह्यातून पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय टॅंकर तैनात ठेवले आहेत. तसेच वारकऱ्यांची सेवा लक्षात घेऊन जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत 15 टॅंकर उपलब्ध करण्याची ग्वाही दिली आहे.
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेनुसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. रविवार (दि. 11) जून रोजी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडधे, गृह शाखेचे नायब तहसीलदार मयूर बेरड, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी वसंतराव गारुडकर, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे, अन्न-औषध प्रशासनाचे निरीक्षक शरद पवार, आदी अधिकारी तसेच एस. आर. थोरातचे श्रीनिवास कोकाटे, मळगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्टचे शंकरराव सत्रे, दूध संघ श्रीगोंदाचे अर्जुन पवार, मुळा ऍग्रोचे लक्ष्मण घोरपडे, सहकार महर्षी रावसाहेब पाटील दूध संघ कर्जतचे एम.एम.शेख, जय मल्हार दूध शीतकरण केंद्र अकोळनेर, आदी 24 दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत अपर जिल्हाधिकारी मापारी यांनी आषाढी वारीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यातून 260 आणि जिल्ह्याबाहेरून 27 पालखी सोहळे नगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आषाढी वारी अर्थात देवशयनी एकादशीसाठी पंढरपूरला जाणार आहेत. या दिंडी सोहळ्यामध्ये नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून येणारे वारकरी लाखोच्या संख्येने सहभागी होत आहेत.