नवी दिल्ली – देशातील मोठ्या खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी खाद्य तेल दरात 10 ते 15 टक्क्यांनी घट केली असल्याचा दावा खाद्यतेल उत्पादकाच्या संघटनेने केला आहे. ज्या कंपन्यानी दर कमी केले आहेत त्यात अदानी विल्मर, रूची सोया, इमीमी, जेमिनी इत्यादी कंपन्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. तेल उत्पादकाच्या संघटनेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्याच्या महागाईच्या काळामध्ये ग्राहकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून मुख्य तेल उत्पादकांनी आपल्या तेलाच्या दरामध्ये घट केली आहे.
देशात खाद्य तेलाचे उत्पादन गरजेपेक्षा कमी होते. त्यामुळे खाद्य तेलाची गरजे आयातिच्या माध्यमातून पूर्ण करावी लागते. परदेशात खाद्य तेलाचे दर वाढले असल्यामुळे देशात खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते.
हे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या महिन्यात खाद्य तेलावरील आयात शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली होती. त्या प्रमाणात देशातील खाद्यतेल उत्पादकांनी खाद्यतेलाच्या दरात कपात करावी असे आवाहन केंद्रीय खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी तेल उत्पादकांना केले होते. त्याला प्रतिसाद देऊन खाद्यतेलाच्या दरात घट करण्यात आली आहे. आता देशामध्ये तेलबियांचे उत्पादन वाढले वाढले आहे. दरम्यानच्या काळामध्ये जागतिक पातळीवरील खाद्य तेलाचे दर कमी होत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये खाद्यतेलाच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता उत्पादकांनी व्यक्त केली आहे.