नगर – गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा ही टॅंकरची मागणी घटली आहे. मे महिन्यात उन्हाचा कडाका वाढला असून 13 टॅंकरद्वारे जिल्ह्यात 56 फेऱ्याद्वारे 32 हजार नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. सध्या संगमनेर, अकोले, व पारनेर या तालुक्यात 13 टॅंकर सुरु आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यापासूनच पाणी टॅंकर सुरु व्हायचे यंदा मात्र, एप्रिल महिन्यापासून पाणी टॅंकर सुरु झाले आहे. नगर जिल्ह्यात 13 टॅंकरद्वारे 19 गावे 88 वाड्यावरील 32 हजार 417 नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
संगमनेर तालुक्यातील 8 गावातील 22 वाड्या वस्त्यावरील 13 हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे. त्यामध्ये टॅंकरच्या 25 फेऱ्या केल्या जात आहेत. तर अकोले तालुक्यातील दोन गावातील 11 वाड्यावास्त्यावरील 5 हजार 400 नागरिकांसाठी 2 टॅंकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच पारनेर तालुक्यात 9 गावातील 55 वाड्यावस्त्यावर 13 हजार नागरिकांसाठी 4 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केले जात आहे. सर्वाधिक टॅंकर हे संगमनेर तालुक्यात आहे. त्या खालोखाल पारनेर व आकोले तालुक्यात सुरु आहे.
नगर जिल्ह्यात 2016-17 या वर्षात सुरु झालेल्या तब्बल 700 टॅंकरच्या पाण्याने दहा लाखाहून अधिक नागरिकांना तहान भागवावी लागत होती. मात्र.त्यानंतर जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने सातत्याने टॅंकरची मागणी घटू लागली होती. गेल्या वर्षी देखील जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात पाणी टॅंकर सुरु होते. पाणी पुरवठा विभागाच्या अंदाजानूसार जिल्ह्यात मार्चनंतर 321 गावे आणि 1 हजार 39 वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण होवू शकते, असा अंदाज व्यक्त केला होता.
त्यासाठी 7 कोटी 37 लाखांची तरतूद करण्यात आली. पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यात मार्चनंतर 321 गावे आणि 1 हजार 39 वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण होवू शकते, असा टंचाई आराखडा तयार केला होता. मात्र, जिल्ह्यात 321 गावांपैकी 19 गावात पाणी टंचाई निर्माण झाली, असल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी मध्ये दिसत आहे.