इंफाळ -मणिपूरमध्ये सोमवारी बंडखोरांच्या दोन गटांत संघर्ष उसळला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात १३ जण मृत्युमुखी पडले. ती घटना म्यानमार सीमेलगत असणाऱ्या तेंगनौपाल जिल्ह्यातील एका गावात घडली.
म्यानमारकडे निघालेल्या काही बंडखोरांवर दुसऱ्या गटातील सदस्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी त्यांना १३ मृतदेह आढळले. ते मृतदेह पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या बंडखोरांच्या गटाच्या सदस्यांचे असल्याचा अंदाज आहे. त्या गटावरील बंदीची मुदत नुकतीच वाढवण्यात आली.
गोळीबाराच्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. गोळीबार जिथे घडला त्या गावाकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. दुर्गम भाग असल्याने त्याचा वापर बंडखोर म्यानमारमध्ये शिरकावासाठी करतात.