नवी दिल्ली- कॉंग्रेसच्या मध्य प्रदेशातील पराभवानंतर कॉंग्रेस नेते (Congress) आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित (Sheela dixit son) यांचे पुत्र संदीप दीक्षित (Sandeep dixit) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसने जिंंकलेली निवडणूक तेथे घालवली असे दीक्षित यांनी म्हटले आहे. (4 state election result)
माध्यमांशी बोलताना दीक्षित म्हणाले, पराभवानंतर आमचा पक्ष कधीच त्याची समीक्षा करत नाही. मी अगोदरच बरेच समजावले होते मात्र त्यांनी ऐकले नाही. मध्य प्रदेशातील पराभवासाठी केंद्रीय नेतृत्वाला जबाबदार धरता येणार नाही. राज्यातील नेतृत्वाची ही पूर्ण जबाबदारी होती. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांचा काळ आता संपला असल्याचे नमूद करत आता नव्या नेतृत्वाला संधी दिली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
ते पुढे म्हणाले, मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीच्या तुलनेत कॉंग्रेस दुबळी ठरली. शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बेहना या लोकप्रिय याजेनेवर आमच्याकडे काहीच उत्तर नव्हते. या महत्वाकांक्षी योजनेचा कॉंग्रेस सामना करू शकली नाही व त्यामुळेच आमचे सगळ्यांत जास्त नुकसान झाले.
महिलांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय होती व त्याला कसे उत्तर द्यायचे हेच कॉंग्रेसला समजू शकले नाही. मध्य प्रदेशातील नेतृत्वावर त्यांनी मनमानीचा आरोप केला आणि म्हणाले की त्यांना मी समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही.