पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेली इयत्ता दहावीची परीक्षा संपली असून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. परीक्षा झाल्यानंतर आता निकालाची उत्सुकताही लागलेली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्यात आला होता. त्या आधीच्या वर्षीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर कसा असणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. मात्र हा पेपर खूपच सोपा गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
15 मार्च पासून सुरु झालेली परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी आपआपल्या पध्दतीने जल्लोष साजरा केला. पेपर सुटल्यानंतर शाळांच्या बाहेर विद्यार्थी गटागटाने जमून गप्पा मारण्यात दंग झाले होते. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या खाद्य पदार्थांवर ताव मारण्याची संधी साधल्याचे पहायला मिळाले. सुट्टयांमध्ये काय काय प्लॅन करुन त्याची अंमलबजावणी करायची याचे वेधही विद्यार्थ्यांना लागले आहेत.