पुणे – हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गुरुवारी ( दि. 20 ) होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा २ ऑगस्टला, तर बारावीची परीक्षा ११ ऑगस्ट होईल, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्यातील रायगड, ठाणे, पालघर, चंद्रपूर, कोल्हापूर, रत्नागिरी अशा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय हवामान विभागाने काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या पुरवणी परीक्षेतील बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गुरुवारी (२० जुलै) होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. दहावीचे पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा २ ऑगस्टला, तर बारावीची परीक्षा ११ ऑगस्ट होईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.