पुणे – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शाळामधून शिजवलेला विविध प्रकारचा पोषण आहार देण्यात येतो.
राज्यातील ८६ हजार ४०० शाळांमधील १ कोटी ५ लाख विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. यासाठी १ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध करुन दिला जातो. राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.
त्यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना २२ एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना २ मे पासून उन्हाळीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिलेल्या कालावधीसाठी नियमानुसार तांदुळ व धान्यादी माल कोरडा शिधा स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकारी यांना देण्याबाबतच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.