प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मागील 24 तासांत चार धरणात मिळून पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा 80 टक्के झाला असून, 23.08 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. मंगळवारीसुद्धा दिवसभर धरण परिसरात पावसाची संततधार होती. पानशेत धरण परिसरात मागील 24 तासांत 115 मिमी, वरसगावमध्ये 118 मिमी आणि टेमघरमध्ये 195 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने ओढे-नाले पुन्हा वाहू लागले आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढू लागला आहे. मागील 24 तासांपूर्वी खडकवासला प्रकल्पात एकूण 21.54 टीएमसी पाणीसाठा होता. आता हा पाणीसाठा 23.04 टीएमसीवर पोहचला आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1005 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
पानशेत 90 टक्के भरले
पावसाचा जोर वाढल्याने पानशेत धरणातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहचला आहे. वरसगाव धरणातील पाणीसाठा 81 टक्क्यांवर पोहचला आहे. टेमघर धरण 63.43 टक्के भरले आहे. खडकवासला धरणात 0.88 टीएमसी म्हणजे 44.50 टक्के पाणीसाठा आहे. तर पानशेतमध्ये 9.53 टीएमसी, वरसगावमध्ये 10.32 टीएमसी आणि टेमघरमध्ये 2.35 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पात 80 टक्के साठा