शालेय शिक्षण मंत्री मा. आशीष शेलार यांचा खुलासा
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने एका खासगी तक्रारीची सुनावणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध कसलेही मतप्रदर्शन केलेने नसून या प्रकरणी खालच्या न्यायालयात आपले म्हणणे मांडण्याची आणखी एक संधी दिली आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी मंगळवारी केले.
निवडणूक अर्ज भरताना आपल्याविरुद्धच्या गुन्ह्यांची माहिती लपविली असल्याचा आरोप करणाऱ्या एका खासगी तक्रारीची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध मतप्रदर्शन केले असल्याचे चुकीचे वृत्त हेतुपूर्वक पसरवले गेले असल्याचे सांगून शेलार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुन्हा कनिष्ठ न्यायालयात सुनावणी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. या तक्रारीची सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने ही तक्रार दखल घेण्याजोगी नसल्याचे सांगत तक्रार फेटाळून लावली होती. त्यावर तक्रारदार सत्र न्यायालयात गेले. सत्र न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निकाल दिलेला नव्हता. उच्च न्यायालयानेही ही तक्रार फेटाळून लावली होती. त्याविरुद्ध तक्रारदार सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने या तक्रारीची सुनावणी कनिष्ठ न्यायालयात घ्यावी एवढेच सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने मा. मुख्यमंत्र्यांविरोधात कसलेही मतप्रदर्शन केलेले नाही. या बाबत धादांत असत्य बातम्या पसरवल्या जात आहेत.
त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक असताना नागपूरमधील एका सरकारी जागेवर बांधल्या गेलेल्या घरांवर महापालिकेने कर आकारावा अशी सूचना केली होती. तसेच आमदार असताना त्यांनी एका सरकारी वकिलाविरुद्धच्या चौकशीची मागणी केली होती. या बद्दल त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आली होती.