मागणीची दखल न घेतल्याने वाघाळेच्या माजी सरपंचाचे उपोषण सुरू
रांजणगाव गणपती -वाघाळे व परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन घडत आहे. त्यातच रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी धरण्याचे काम करावे लागत असल्याने शेतामध्येही साप, किडूक आदींची भीती असल्याने वीज वितरण कंपनीने थ्री फेज विद्युत पुरवठा दिवसा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीची दखल न घेतल्याने माजी सरपंच तुकाराम भोसले यांच्या नेतृत्वाखाली दोन डिसेंबरपासून आमरण उपोषण चालू करण्यात आले असल्याचे वाघाळे ग्रामस्थांनी सांगितले.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असूनही व उपोषणाचा दुसरा दिवस असूनही शासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळाला उपोषण स्थळाला भेट दिली असता हा निर्णय वरिष्ठांच्या पातळीवरती असल्याने आम्ही काही करू शकत नसल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर संतापाची लाट निर्माण झाली आहे. प्रशासनाने योग्य वेळी निर्णय घेतला नाही तरी आंदोलनाची व्याप्ती वाढणार असल्याचे यावेळी माजी सरपंच तुकाराम भोसले यांनी बोलताना सांगितले. दरम्यान रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार नानासाहेब काळे यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन आढावा घेतला.