मुंबई : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवी बैठक मुंबईत सुरू झाली. या बैठकीनंतर हे तीनही पक्ष एकत्रितपणे त्यातील णिर्णयांची माहिती पत्रकारांना देणार आहेत. ही चर्चा सरकार स्थापनेतील अंतीम चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात यशस्वी झाल्यानंतर सत्तस्थापनेचा दावा करण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले
दरम्यान, राज्यात शिवसेनेनच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना सांगितले.दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत येत्या दोन ते तीन दिवसांत सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर पक्षाच्या नवर्विाचित आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्याला ठाकरे मार्गदर्शन करत होते, राज्यात सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यात जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा फोनही आला नाही. त्यामुळे शिवसेनेने युती तोडली हा आरोप चुकीचा आहे. शिवसेनेला त्यांचा हक्क हवा होता. तो देण्यास नकार दिल्याने युतीची प्रक्रिया थांबली. शिवसेनेने युती तोडली ही भाषा शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्यासाठी केली जात आहे, असे ठाकरे म्हणाले असल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.