शितलदेवी मोहीते पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी
अकलूज- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न व मागण्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना निवेदन दिले आहे.
1 एप्रिल 2007 ते 31 डिसेंबर 2019 अखेर पर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्यांना रहाणीमानभत्ता फरक जवळ जवळ 2 लाख 52 हजार रुपये ग्रामपंचायतीकडून येणे आहे. परंतु ही रक्कम कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यास वसुलीचे कारण सांगुन ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रजा, सुट्टया, देखील दिल्या जात नाहीत. कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके, प्रोव्हीडंट फंड, विमा या बाबी देखील अपुर्ण ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत वर्ग 3 व 4 च्या पदावर 10 टक्के आरक्षण ठेवले आहे. जिल्हा परिषदेने क संवर्गातील 415 रिक्त पदे भरण्यासाठी मार्च 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, लिपीक, विस्तार अधिकारी (सां) ही एकूण पदाच्या 10 टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वाटयास आली आहेत.
ती पदे तात्काळ भरावीत व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत यासाठी जिल्हापरिपद सदस्या शितलदेवी मोहीते पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, कार्याध्यक्ष मोहन लामकाने, सरचिटणीस महादेव माळी, उपाध्यक्ष अनिल घंटे उपस्थित होते.