आमदार पाचर्णे; डिंभे, चासकमान कालव्याच्या कामांसाठी निधी
शिरूर- शिरूर तालुक्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डिंभा उजव्या कालवा अस्तरीकरणासाठी 32 कोटी 57 लाख रुपयांच्या कामाला मंजुरी मिळून त्याची निविदाही निघाली आहे त्यामुळे यापुढील काळामध्ये हे पाणी तालुक्याच्या शेवटच्या गावापर्यंत पोहचणार आहे. तसेच, चासकमान कालव्याची गळती रोखण्यासाठीही अस्तरीकरणाचे काम होणार असून 453 कोटी 62 लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे, यामुळे तालुक्यातील टेल टू हेड आणि हेड टू टेल, असा वाद मिटणार असल्याने हे दोन्ही निर्णय शिरूर तालुक्यासाठी ऐतिहासिक असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, दिलीप हिंगे उपस्थित होते. या दोन्ही कामांसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री बाळासाहेब भेगडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याबाबत निर्णय घेतले, असे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.
डिंभे धरणातून निघालेला उजवा कालवा 150 कि.मी.चा असून याची अनेक ठिकाणी गळती होत आहे. त्यातच शिरूर आमदाबाद, निमगाव भोगी, अण्णापूर, कर्डेलवाडी, सरदवाडी, गोलेगाव या भागामध्ये काही जणांनी कालव्याचे काम बंद पाडले होते; त्यामुळे या भागात पाणी येत नव्हते, यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत होते. परंतु, आता अस्तरीकरणाच्या कामासाठी नऊ कोटी 81 लाख 752 रुपये, अभियांत्रिकी कामासाठी नऊ कोटी 99 लाख हजार 688 रुपये तर शिल्लक यांत्रिकी व अस्तरीकरणसाठी 11 कोटी 76 लाख 69 हजार 930 खर्च केल जाणार आहे. तसेच, चासकमान कालव्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता निघाली आहे, यासाठीही 453 कोटी 62 लाख रुपये मंजूर असून कालव्याच्या 72 कि.मी.साठी 262 कोटी 63 लाख यातून गळती व लाईनचे काम होणार असून 73 ते 91 साठी 136 कोटी, 91 ते 144 साठी 4 कोटी 75 लाखाचा तरतूद करण्यात आली आहे. कालव्याचे अस्तरीकरण, गळती थांबविण्यासाठी, पुढील काळामध्ये जमीन संपादन न करता शेतातून पाइप टाकून टाकण्यात येणार आहेत. हे पाइप जमिनीपासून तीन फूट आत मध्ये टाकण्यात येतील. या कामांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- पुनर्वसनचा प्रश्नही मिटणार…
चासकमान व भामाआसखेडचे पुनर्वसन हवेली येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडले आहे. मात्र, हे पुनर्वसन लवकरच उठविण्यात येणार आहे. चासकमानचे पाणी ज्यांना मिळत आहे, त्यांची गाव उठवली जाणार नाही. परंतु, ज्यांना पाणीच मिळत नाही, अशांच्या सातबारावरील शेरे काढण्यात येणार आहेत. यासाठी पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार एकनाथ खडसे यांची विशेष बैठक होणार असून यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याने चासकमान व भामा आसखेड पुनर्वसन प्रश्नही मिटणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.