- 430 जणांचा लागला शोध; 87 जण अद्यापही बेपत्ता
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातून बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात शहरातून 517 जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यापैकी 430 जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी 87 जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. यामुळे बेपत्ता झालेल्या व्यक्ती जातात तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अभ्यासाच्या धास्तीतून, पालक रागविल्यामुळे तसेच प्रेमप्रकरणातून बेपत्ता होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बेपत्ता झालेल्या मुलांच्या शोध व्हावा, यासाठी न्यायालयाने या मुलांची बेपत्ता म्हणून नोंद न करता अपहरण म्हणून नोंद व्हावी, असे आदेश दिले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याच्या कलमांमध्ये बदल केला. मात्र आजही बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पोलीस काहीही प्रयत्न करीत नाहीत, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.
“ऑपरेशन मुस्कान’ केवळ नावापुरतेच
बेपत्ता झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना तुम्हीच सांगा मुलांचा कुठे शोध घेऊ, असे पालकांना पोलीस वचारतात. जर पालकांना माहिती असती तर त्यांनीच मुलांचा शोध घेतला नसता का? बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावर केवळ नावापुरते “ऑपरेशन मुस्कान’ राबविण्यात आले. मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही.
पोलीस बेपरवाईचे हे एक उदाहरण
शुक्रवारी (दि.13) पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक 12 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून घेतला. मात्र तिचा शोध घेतला नाही. दुसऱ्या दिवशी ती मुलगी घरी आल्यावर तिच्यावर शेजारी राहणाऱ्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. या घटनेत पोलिसांनी तिच्या घराच्या आसपास शोध घेतला असता तर कदाचित ती मुलगी मिळाली असती आणि तिच्यावरील अत्याचार टळलाही असता. याबाबत जाब विचारणाऱ्या वुमेन्स हेल्पलाइनच्या महिला कार्यकर्त्यांनाच पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने पोलिसांच्या तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
87 जण अद्यापही बेपत्ता
पिंपरी चिंचवड शहरातून बेपत्ता झालेल्या 87 जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामध्ये 64 मुलींचा समावेश आहे. प्रेमप्रकरणातून ही मुले पळून गेली असती तर त्यांचा शोध लागला असता. मात्र त्यांचा अद्यापही शोध लागलेला नसल्याने मुले पळविणारी टोळी शहरात कार्यरत नाही ना, अशी शंका पालकांच्या मनात निर्माण होण्यास वाव आहे. सर्वाधिक बेपत्ता 14 मुली या पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यानंतर वाकड पोलीस ठाण्याचा क्रमांक लागतो. वाकडमधून बेपत्ता झालेल्या 10 मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. तर तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या 22 जणांपैकी सर्वच्या सर्वजण मिळून आले आहेत.