आपल्या जीवनात नात्यांना फार महत्त्व आहे. त्यातल्या त्यात ओघाने येणाऱ्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते मोठे जिवाभावाचे असते. मैत्री ही जशी व्यक्तींशी असते तशी एखाद्या छंदाशीही असते. वाचन आणि संगीत या दोन गोष्टींशी मैत्री असलेली व्यक्ती कधीच एकटेपणा अनुभवत नाही. म्हणून पुस्तकांशी मैत्री करू या.
पुस्तकांशी लहानपणीच जर मैत्री झाली ना तर फार छान. त्याची गोडी वाढतच जाते. ही अशी मैत्री आहे की समोरचा मित्र सर्वस्व द्यायला तयार आहे. आपलीच अवस्था… “देता किती घेशील दो कराने’ अशी असते.
खरंच पुस्तकाच्या दुकानात जरी एखादा फेरफटका मारला किंवा एखाद्या पुस्तक प्रदर्शनाला जरी भेट दिली की, कळतं किती विषयांवरची पुस्तके उपलब्ध आहेत. ती आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी सज्ज आहेत. कथासंग्रह, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, अनुवादित, नाटक, प्रवासवर्णने, पाककृती, धार्मिक या सर्व विषयांवरील पुस्तके आपण नेहमी वाचतो.
या सर्व विषयांवर अनेक सिद्धहस्त लेखकांनी इतकी अजोड कामगिरी केलेली आहे की, त्याला तोड नाही. आपल्याला आवडणाऱ्या साहित्य प्रकारात खुशाल आनंदाने विहार करावा. याशिवाय वैज्ञानिक संशोधन विषयावरची, ज्योतिष शास्त्र, सौंदर्य शास्त्र, आध्यात्मिक, शेअर बाजार, लहान मुलांसाठी अशा कितीतरी विषयांवर पुस्तके उपलब्ध आहेत. गरज आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची.
नव्या कोऱ्या पुस्तकाचा एक वेगळाच गंध असतो, तो मनाला उल्हासित करतो. उत्सुकता वाढवतो. “वाचाल तर वाचाल’ हे प्राप्त परिस्थितीत तर खरंच लागू पडते. घरात बसण्याची वेळ आल्यावर, पुस्तकांसारखा सोबती नाही.
हल्ली बऱ्याच समविचारी स्त्रिया एकत्र येऊन वाचक मंचासारखे उपक्रम चालवितात. पुस्तके खरेदी करतात. वाचलेल्या चांगल्या पुस्तकावर चर्चा करतात. नवीन वाचलेल्या पुस्तकाची ओळख मैत्रिणींना करून देतात. त्यामुळे आपोआपच विचारांची देवाण-घेवाण होते. वाचनाचे आयाम बदलतात. या उपक्रमातून वाचनाची आवड तर वाढतेच पण लिखाणाचीही गोडी वाढते. असे उपक्रम पुस्तकांशी मैत्री, सलोखा वाढवतात.
आताच्या इलेक्ट्रॉनिक युगात लायब्ररीला पर्याय म्हणून लॅपटॉपवर किंवा मोबाइलवरदेखील पुस्तके उपलब्ध होतात. जवळ पुस्तक नाही म्हणून अडत नाही.
पुस्तकांच्या बाबतीत काही वेळा लोकांचा फार वाईट अनुभव येतो. आवडीने वाचायला नेतात पण पानावर खुणा काय करतात, पाने दुमडून ठेवतात. अगदी पेनाने रेघोट्यासुद्धा मारतात. नेलेले पुस्तक आठवणीने परत करण्याचेसुद्धा विसरतात. माझी एक मैत्रीण मात्र माझ्या पुस्तकाला कव्हर नसेल तर आठवणीने छान कव्हर घालून, वेळेवर पुस्तक परत करते. असं पुस्तकावर प्रेम करता यायला हवं.
याशिवाय ज्या आवडीने आपण एखादी साडी किंवा ड्रेस घेतो त्याच आवडीने पुस्तकांची खरेदी व्हायला हवी.
एक पुस्तक वाचले की, दहा माणसे भेटतात असे म्हणतात. सध्याच्या काळात माणसांना भेटणे कठीण झाले आहे तेव्हा पुस्तकात त्यांना भेटून आनंद मिळवू या…
आरती मोने