– राहुल गोखले
पश्चिम बंगालमधील दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्षाची भिस्त आता उत्तर प्रदेशवर आहे, हे लपलेले नाही.
उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळविले होते. मात्र, निकाल लागल्यानंतर अनपेक्षितरित्या योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपद बहाल केले होते. वास्तविक आदित्यनाथ हे त्यावेळी खासदार होते; तरीही त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे त्यावेळचे अध्यक्ष अमित शहा यांच्या धक्कातंत्राला साजेसेच. तथापि, धक्कातंत्र काही काळ आकर्षक वाटले तरी त्याची उपयुक्तता कालांतराने दृग्गोचर होऊ लागते. गोवंश हत्येच्या आरोपांवरून झालेले रणकंदन, रोमियोविरोधी गटांची निर्मिती, कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार यामुळे आदित्यनाथ यांची प्रतिमा एका कठोर प्रशासकाची झालेली होती.
करोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र त्या प्रतिमेस तडे गेले. हेलपटलेली आरोग्य यंत्रणा, प्राणवायूची कमतरता, करोना रुग्णांच्या मृतदेहांची झालेली विटंबना या सगळ्याने आदित्यनाथ सरकार टीकेचे लक्ष्य ठरले आणि भाजपमधूनदेखील आदित्यनाथ यांच्या विरोधात सूर उमटू लागले. साहजिकच शेजारील उत्तराखंडमध्ये गेल्या काही महिन्यांत तीनदा मुख्यमंत्री परिवर्तन करण्याची जी नामुष्की भाजपवर आली तीच वेळ उत्तर प्रदेशात पुढील वर्षीच्या सुरुवातीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर येते का, हा प्रश्न उपस्थित झाला होता. तथापि, नुकत्याच केलेल्या उत्तर प्रदेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी आदित्यनाथ यांची तोंडभरून प्रशंसा केली. त्यामुळे आता आदित्यनाथ यांना बदलण्यात येणार नाही हे निश्चित झाले आहे. तथापि, मुळात मोदींना आदित्यनाथ यांच्या प्रशंसेतून नेमका कोणता संदेश द्यायचा होता आणि कोणाला द्यायचा होता याचा अन्वयार्थ लावणे गरजेचे.
मोदींनी आपल्या वाराणसी मतदारसंघाला भेट दिली आणि सुमारे दीड हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण केले. त्यावेळी केलेल्या आपल्या अर्ध्या तासांच्या भाषणात मोदींनी आदित्यनाथ यांच्या कारभारावर स्तुतिसुमने उधळली. एरव्ही यात अचंबा वाटावा असे काही नाही. आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविषयी पंतप्रधानांनी प्रशंसोद्गार काढणे स्वाभाविक. तथापि, मोदींनी आदित्यनाथ यांची स्तुती केली ती गेल्या साडेचार वर्षांत उत्तर प्रदेशात केलेल्या विकासासाठी आणि मुख्य म्हणजे करोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी. वास्तविक उत्तर प्रदेशात विकास झाला असल्याचा दावा केला जात असला तरीही जातीय समीकरणात भाजपला रोषाचा सामना करावा लागत आहे, हे विसरता येणार नाही. मुख्य म्हणजे कॉंग्रेसमधून जितीन प्रसाद यांना आयात करण्याची वेळ भाजपवर आली ती मुख्यतः तेथील ब्राह्मण समाजाला चुचकारण्यासाठी.
ब्राह्मण समाजातून आदित्यनाथ यांच्याविषयी अनेक तक्रारीही आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्यंतरी आदित्यनाथ मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आल्या होत्या आणि मोदींचे निकटवर्तीय ए. के. शर्मा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार अशाही वदंता होत्या. तथापि, आदित्यनाथ यांनी अखेरीस शर्मा यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदावर बोळवण करण्यात यश मिळविले आहे.
एका अर्थाने मोदींनी आदित्यनाथ यांच्या केलेल्या प्रशंसेचा अर्थ आदित्यनाथ यांना मोदी यांचा पूर्ण पाठिंबा आहे हा आहे आणि उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येतील हा संदेश मोदींनी त्यातून दिला आहे. शिवाय उत्तर प्रदेश भाजपमधील कोणाच्या महत्त्वाकांक्षा उफाळून येत असतील तर त्या म्यान केल्या जाव्यात हाही इशारा त्यात आहे. तेव्हा आदित्यनाथ यांच्यावाचून भाजपला उत्तर प्रदेशात यशाची खात्री नसावी ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची कबुली त्यात असू शकते. पण खरेच तसे आहे का हेही पाहणे गरजेचे, की काहीही केले तरी उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेत गेल्या वेळीप्रमाणे पुनरागमन करणे शक्य नाही याची जाणीव झाल्याने आणि पश्चिम बंगालचा धडा घेऊन भाजपचे केंद्रीय नेतृत्व अगोदरच बळीचा बकरा शोधून ठेवण्याची तजवीज करीत आहे हेही पाहणे औत्सुक्याचे.
उत्तर प्रदेश गमावणे भाजपच्या जिव्हारी लागणार यात शंका नाही. पण अशा वेळी निदान त्यात आपल्याला दोषी ठरवले जाऊ नये याची आगाऊ व्यवस्था तर केंद्रीय नेतृत्व करीत नाही ना, अशी शंका येण्यास पुरेसा वाव आहे. अन्यथा प्रत्येक निवडणूक मग ती लोकसभेची असो किंवा महानगरपालिकेची असो मोदी-शहा यांच्याच प्रतिमेवर लढविणाऱ्या भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी आदित्यनाथ यांची प्रशंसा करावी हे काहीसे अगोदरच्या व्यूहनीतीला विसंगत आहे.
करोनाची दुसरी लाट हाताळण्यावरून मोदींनी आदित्यनाथ यांची प्रशंसा करावी हे तर आणखीच विचित्र. याचे कारण मुळात केंद्र सरकारचेच करोनाच्या लाटेतील अपयश सर्वश्रुत आहे. याचीच शिक्षा म्हणून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ खांदेपालटात मोदींनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांची उचलबांगडी केली.
सर्वोच्च न्यायालयापासून अनेक न्यायालयांनी केंद्र सरकारची खरडपट्टी काढली. योगी आदित्यनाथ सरकार त्या दोषांपासून दूर नाही. कुंभमेळा असो किंवा आताची प्रस्तावित कावड यात्रा असो; करोना असताना आदित्यनाथ सरकारची निकृष्ट कामगिरी न्यायालयाच्या टीकेचे लक्ष्य झाली होती आणि आहे. तेव्हा करोनाच्या दुसऱ्या लाटेत अपयशी ठरलेल्या मोदी यांनी तितक्याच अपयशी ठरलेल्या आदित्यनाथ यांची प्रशंसा करावी आणि आदित्यनाथ यांनी मोदींची स्तुती करावी या परस्पर प्रशंसेत एकमेकांच्या उणिवा झाकण्याचा प्रयत्न अधिक दिसतो. मात्र, मोदींनी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली म्हणून जमिनीवरचे वास्तव बदलत नाही. जनतेने करोनाच्या दुसऱ्या लाटेत जे सोसले आहे ते अशा स्तुतीने विस्मरणात जाईल अशी जर मोदींची आणि आदित्यनाथ यांची अपेक्षा असेल तर ती वास्तवापासून दूर आहे.
लोकसंख्या धोरण आणून करोनाच्या दुसऱ्या लाटेतील वेदनांचा विसर पडेल अशी जर आदित्यनाथ आणि मोदींची धारणा असेल तर ती वास्तवाची जाणीव असल्याची निदर्शक नाही. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदींनी आदित्यनाथ यांची स्तुती केली याचा उद्देश निवडणुका जिंकणे हा असला तरी त्याचा दुसरा उद्देश बहुधा निवडणुकीत पराभव झालाच तर आदित्यनाथ यांना सर्वस्वी जबाबदार धरून आपली त्यातून सुटका करून घ्यावी, असाही असू शकतो.