नगर -गेल्या तीन महिन्यांपासून रक्तदान शिबिर न झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. करोनाबरोबरच इतर आजारी रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज भासते. परंतु रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना रक्तपुरवठा केला जात नाही. या पार्श्वभूमीवर भाजपयुवा मोर्चाच्यावतीने नगर शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात येत असून रक्तदानासाठी समाजात लोकचळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष तुषार पोटे यांनी केले.
भाजपयुवा मोर्चाच्यावतीने जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोटे बोलत होते. यावेळी शहर जिल्हा संयोजक मिलिंद भालसिंग, युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन शेलार, मध्य मंडलाध्यक्ष अजय चितळे, मंडळ संयोजक नितीन जोशी, अभिषेक शिंदे, बंटी ढापसे, लक्ष्मीकांत तिवारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भालसिंग म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास टाकून जनतेने दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता दिली. वर्षाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये विविध निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला. या पार्श्वभूमीवर आम्ही नगर शहरामध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, असे ते म्हणाले.