पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) – गेल्या तीन महिन्यांपासून जगभरात “करोना’ने थैमान केले आहे. महासत्ता आणि प्रगत मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये देखील “करोना’ने सव्वा दोन लाखांहून अधिक लोकांचे बळी घेतले आहेत. त्या तुलनेत देशात “करोना’ने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात “करोना’ने मृत्यू होण्याचे प्रमाण तर अत्यल्प आहेच, परंतु इतरही कारणाने मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय स्वरुपात घटले आहे. गेल्या आठ वर्षांत सर्वांत कमी मृत्यूंची नोंद यावर्षी मार्च महिन्यात झाली आहे.
गेल्या आठ वर्षातील मार्च महिन्यातील मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या पाहिल्यास यंदाच्यावर्षी मार्चमध्ये सर्वाधिक मृत्यूदर कमी आहे. याची कारणेही वेगळी आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी फेसबुक लाइव्हमध्ये नागरिकांना दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने “करोनासोबत जगताना’ या शीर्षकाखाली दररोज फेसबुक लाइव्ह करण्यात येते. याचा आज तिसरा भाग होता. करोना संदर्भात ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि दुर्धर आजार असलेल्या नागरिकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर गुरुवारी मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी महापौर माई ढोरे, डॉ. श्रीरंग गोखले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, गेल्या आठ वर्षातील आकडेवारी महापालिकेने काढली आहे. त्यामध्ये यंदाच्या मार्च महिन्यात सर्वाधिक कमी मृत्यूदर आहे. संचारबंदीमुळे अपघाताची संख्या कमी झाली आहे. नागरिक संपूर्ण वेळ कुटुंबासोबत राहत असल्याने ताणतणाव कमी झाला आहे. त्यातून विविध आजारावर मात होत आहे. त्यामुळेच मृत्यूचे दर कमी आहेत.
यावेळी महापौर माई ढोरे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा घरातच राहण्याचे आवाहन केले. तर डॉ. श्रीरंग गोखले यांनी “करोना’बाबत मार्गदर्शन केले.
काय आहेत कारणे
रस्त्यावरील वाहनांची संख्या घटल्याने अपघाताचे प्रमाण नगण्य झाले आहे. उद्योग-धंदे बंद असल्याने कामाचा ताण-तणाव घटला आहे. “करोना’सोबत लढा देण्यासाठी सर्वच जण आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने आपला आहार आणि दैनंदिन जीवनशैली बदलली आहे. नागरिक स्वतःच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेत आहेत. यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. तसेच व्यसनाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. कर्जाचे हप्ते तूर्तास टळले असल्याने बहुतेक नागरिकांना सध्या आर्थिक चिंता सतावत नाहीत. यामुळे अपघाती मृत्यू, हृदय व अन्य विकाराने मृत्यू, आत्महत्या यांचे प्रमाण लक्षणीय स्वरुपात घटले आहे. |
|