भाजपाला 16, शिवसेना 14, कॉंग्रेस 4 तर राष्ट्रवादी, सपाला प्रत्येकी 1 जागा
मुंबई : शिवसेना-भाजपाची पिछेहाट झाली असली तरी महायुतीला मुंबईकरांनी साथ दिली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचे 2014 साली मिळालेल्या जागा इतकेच 14 आमदार जिंकून आले आहेत. तर गेल्यावेळेपेक्षा एक जागा वाढून भाजपने 16 ठिकाणी विजयी घोडदौड केली आहे. कॉंग्रेसला चार, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. मनसेचे मात्र मुंबईत इंजिन धावलेच नाही.
महायुतीला मुंबईकरांनी साथ देत त्यांच्या पदारात 30 जागा टाकल्या. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाने प्रत्येकी तीन जागा जिंकत आघाडीला धोबीपछाड दिला. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महायुतीची संयुक्त प्रचारसभा घेतली होती. या सभेचा युतीला चांगलाच फायदा झाला आहे.
दक्षिण मुंबईत सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या भायखळा मतदारासंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी एमआयएमच्या वारिस पठाण यांचा पराभव केला. कुलाब्यात भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी कॉंग्रेसच्या भाई जगताप यांचा पराभव करून अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. दक्षिणमध्य मुंबईत मनसेचे नेते राज ठाकरे यांची होम पिच असलेल्या माहीममध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. येथे सेनेच्या सदा सरवणकर यांनी मनसेच्या संदीप देशपांडेंचा पराभव केला. धारावीत कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड तर अणुशक्तिनगरमध्ये शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांचा पराभव करीत राष्ट्रवादीचे नवाब मलिक निवडून आले आहेत.
उत्तरमध्य मुंबईतील चांदिवलीमध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे आणि कॉंग्रेसचे नसीम खान यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत लांडे यांनी खान यांच्यावर फक्त 400 मतांनी मात केली. मालाड पश्चिममध्ये कॉंग्रेसचे अस्लम शेख आणि भाजपचे रमेशसिंह ठाकूर यांच्यातील लढत शेवटपर्यंत रंगली. येथे शेवटच्या फेछयांमध्ये शेख यांनी ठाकूर यांच्यावर मात केली. मागाठणेमधून मनसेला विजयाची अपेक्षा होती. परंतु, शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी मनसेचे नयन कदम यांचे आव्हान परतून लावले.
वायव्य मुंबईतील सर्व जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या आहेत. येथे कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांची डाळ शिजली नाही. वर्सोव्यात भाजपच्या भारती लव्हेकर यांनी शिवसेना बंडखोर उमेदवार राजूल पटेल यांचे आव्हान मोडून काढले. तर अंधेरी पूर्वमध्ये शिवसेना आणि भाजप बंडखोराच्या लढतीत सेनेचे रमेश लटके यांनी बाजी मारली. ईशान्य मुंबईत भाजपला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. मानखुर्द-शिवाजीनगरमधून समाजवादी पक्षाचे अबू आझमी निवडून आले आहेत.
महापौर पराभूत
वरळीत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी निर्विवाद विजय मिळवला असला तर मातोश्रीचे अंगण असलेल्या वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचा पराभव झाला आहे. वाद्रे पूर्वमधून शिवसेनचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे महाडेश्वर यांना पराभूत व्हावे लागले. शिवसेनेतील बंडखोरीचा लाभ कॉंग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांना मिळाला. शिवसेनेची मते विभागली गेल्याने सिद्दीकी यांना विजयाचा गुलाल उधळता आला. महाडेश्वर यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी चांगलाच जिव्हारी लागला आहे.