पुणे : महापालिकेकडून समान पाणी योजने अंतर्गत कळस-धानोरी मधील गणेशनगर परिसरात सर्वात आधी नवीन जलवाहीन्या बसविण्याचे तसेच मीटर बसविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र त्यानंतर या भागातील पाणी पुरवठाच विस्कळीत झाला असून गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात मोठया प्रमाणात कमी दाबाने आणि अपूरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे, या भागातील पाणी पुरवठा तातडीनं सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक अनिल टिंगरे यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना टिंगरे म्हणाले की, या भागात भामा-आसखेड योजनेचे पाणी आलेले असतानाही महापालिका अद्यापही जागतिक बॅकेव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जागतिक बॅंक योजनेतून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने त्यांच्या दुरुस्तीकामी किमान 8-10 दिवस सदर परिसराचा पाणीपुरवठा बंद असतो. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांचा विरोध असताना देखील पाण्याचे मीटर बसविण्याचे काम प्रशासनाच्या सुचनानुसार सर्वप्रथम याच भागात सुरु करण्यात आले होते. तसेच समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत परिसरातील जलवाहिन्या बदलण्याचे कामही याच परिसरात सर्वप्रथम करण्यात आले असतानादेखील नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अनेकदा अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असल्या तरी पाणी मिळत नाही त्यामुळे तातडीनं याबाबत दखल न घेतल्यास तसेच नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्यास महापालिका जबाबदार असेल असा इशारा टिंगरे यांनी यावेळी दिला आहे.