नगर – शहरातील नाले, ओढे अरुंद झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून, ते अनेकांच्या घरामध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांना या समस्येला कायमच तोंड द्यावे लागते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे मनपा कायमच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील गायब झालेले नैसर्गिक ओढे, नाले शोधावेत अन्यथा भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील, त्याला जबाबदार पालिका असेल असे, नगरसेवक योगीराज गाडे यांनी म्हटले आहे.
प्रभाग क्र. चार गुलमोहर रोड येथील दळवी मळा, गणेश कॉलनी व पारिजात चौक परिसरातील कॉलनीमध्ये व रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे तळे साचत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर काही ठिकांणी नागरिकांचा घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या ठिकाणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या सहाय्याने काम हाती घेतले असून नागरिकांच्या समस्या दुर केल्या आहेत.
30 वर्षापूर्वीपासून असणारे नैसर्गिक ओढे नाले गायब झाले आहेत. त्यामुळेही नागरिकांच्या घरात पाणी घुसत आहे. मनपाने त्या ओढ्यानाल्यांचा शोध घ्यावा असे ही ते म्हणाले.