भाकपचे टीकास्त्र: मोदी सरकारच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात
पाटणा : जातीय आधारावर ध्रुवीकरण घडवण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विभाजनवादी मुद्दे मांडले जात आहेत. त्यामुळे देशात यादवीसदृश स्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) सोडले.
भाकपचे सरचिटणीस डी.राजा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचा (का) मुद्दा उपस्थित केला. तो कायदा केवळ मुस्लिमांशीच नव्हे तर आदिवासी आणि इतर वांशिक गटांशी भेदभाव करणारा आहे. त्यामुळे जनतेला चिंता वाटत असल्याने देशभरात निदर्शने होत आहेत. तो कायदा रद्द केला जावा, अशी मागणी त्यांनी केली.
संबंधित कायदा केवळ घटनाबाह्य नसून घटनाविरोधी आहे. मात्र, त्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अतिशय ताठर भूमिका घेत आहेत. त्यामुळेच त्या कायद्याला राज्यांकडून उघडपणे विरोध होत आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशाला आर्थिक संकटातून जावे लागत आहे. मात्र, सरकार फक्त मतपेढीच्या राजकारणातच व्यस्त आहे, असा आरोपही राजा यांनी केला.