माझं अन् माझ्या परिवाराचं या निर्दयी राजकारणापायी काही अघटित होण्यापेक्षा यापासून अलिप्त झालेलं केव्हाही बरं.
मित्र हो, एका बुद्धिजीवी वर्गाचं राजकारण आज कोणत्या थराला चाललंय? हे पाहून मन उद्विग्न झालंय. काल दुपारी फोन वर “तुझी व माझी आजपासून लागली.
तू आता राजकारणातून संपलाच. आता एक तर तुझा तरी परिवार संपेल, नाही तर माझा तरी परिवार संपेल. एवढं लक्षात ठेव’, या भाषेत मला सांगण्यात आलं. अन् ते ही सहकारातील, शिक्षक संघटनेतील अनेक जबाबदार पदांवर काम केलेल्या व्यक्तिमत्वाकडून. असं कधी होईल, असा विचार मीच काय आणखी कुणीच करू शकणार नाही. अशा व्यक्तीकडून, ज्यांना अनेकांनी आपलं राजकीय गुरू मानलं.
त्यांनी असं म्हणावं? क्षणभर मी पुरता गांगरून गेलो. त्या शब्दांनी मन पार उद्विग्न झालं. समाजसेवेचे माध्यम म्हणून आपण या शिक्षकी राजकारणात अडकलो? कशासाठी? याचंच उत्तर शोधतोय.
आपल्या सर्वांचे आदरणीय माजी शिक्षक नेते द. मा. ठुबे गुरुजी यांनी मला अन् माझ्या परिवाराला संपवण्याची भाषा आज का अन् कशासाठी केली? मी कधी कॉल रेकॉर्ड ठेवत नाही. तरी तसा गुन्हा दाखल करून ते मिळवताही येईल. थराला जर आपण समाज घडवणारी माणसं जर जाणार असू, तर यात काहीही राम उरलेला नाही, असंच वाटतंय. एकदम सर्वसामान्य कुटुंबातील माझं व्यक्तिमत्त्व. आमच्या परिवारात कुणीही शिक्षकी क्षेत्रात नव्हतंही. कसला राजकीय वारसाही नाही.
केवळ मित्रांच्या आग्रहाखातर मी एक शिक्षक समाजसेवेचं माध्यम म्हणून मी या राजकारणात आलो. पण, मी आलो तेव्हाच संपलेलो आहे, या भूमिकेत सदैव काम करत राहिलो. राजकारणातून संपण्याची भीती मला तेव्हाही नव्हती, आताही नाही अन् कधीही नसणार.
पण इतरांप्रमाणे मलाही कुटुंब आहे. मलाही भावना आहेत. या स्वार्थी राजकारणात माझा परिवार जर नाहक कुठल्या त्रासाला बळी पडणार असेल, तर मीच यातून बाहेर पडलेलं कधीही चांगलं, असं माझं अंतर्मन मला आज स्पष्ट सांगतंय. बापू बस्स झालं..!