मुंबई : आम्ही भाजपमध्ये मोठी मेगा भरती केली असली तरी सरसकट दरवाजे उघडलेले नाहीत, त्यासाठी फिल्टर लावण्यात आले आहे. भाजपमध्ये संधी ही प्रामाणिक कार्यकर्त्यालाच मिळाली आहे आणि इथून पुढेही मिळेल. मी स्वतः सामान्य परिवारातून आहे. निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही यासाठी पक्ष काळजी घेतो, असे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष योग्यच निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. आशिष शेलार म्हणाले, भाजपात येणारे सगळे साधुसंत नाहीत, हे एकनाथ खडसे यांचे विधान सत्य आहे. भाजपमध्ये येणारे अनेकजण पक्षाच्या नियमात बसणारे नाहीत. पण राजकारणामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टी कराव्या लागतात. ज्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे त्यांना आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अविश्वास म्हणून नाही घेतले. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून केवळ योग्य व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, युती होणार आहे, युतीचे चित्र स्पष्ट आहे, फक्त चित्रामध्ये रंग भरणे सुरु आहे. पण भाजप 160 जागा लढणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, विधानसभा निवडणूक या राज्यातील मुद्यावरच लढल्या जातील. काश्मीर मुद्दा हा आमचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. देशातील विविध शहरात जाऊन गृहमंत्री अमित शहा हे या संदर्भात व्याख्यान देत आहेत. तसाच कार्यक्रम मुंबईत देखील आयोजित केला होता, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि किरीट सोमय्या यांना नक्कीच न्याय मिळेल, असेही सांगितले.