निमसाखर-वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निमसाखरमधील नीरा नदीला पूर आला असून निमसाखरमधील कळंब-अकलूज रस्त्यावरील दोन्ही ओढ्यांना पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दरम्यान वाढलेल्या पाण्यामुळे कळंब, निमसाखर व निरवांगी या भागातील नदी काठालगतचे मोठे क्षेत्रात पुराचे पाणी शिरल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धरणातून प्रचंड प्रमाणात नीरा नदीत पाणी सोडल्याने आज दुसऱ्या दिवशीही परिसरात चारही कोल्हापुरी बंधाऱ्यांवर पाणी आहे. यामुळे सोलापुर जिल्ह्याशी दोन्ही भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. कळंब लगतचे चिखली, कळंब याच बरोबर निमसाखर – कळंब रोडवरील शेळगावओढा व खोकडवडा हे दोन्ही तर निमसाखर – निरवांगी रोडवरील नंदीकेश्वर मंदिरालगतचा ओढ्यावरही या पुराचे पाणी आहे. ओढ्यालाही पाण्याचा फुगवटा आला असून निमसाखरमधील खंडोबानगर परिसरात हे पाणी शिरले असले तरी किरकोळ वगळता मोठे नुकसान नाही. निमसाखर आणि लवटेवस्तीकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेला आहे. स्मशानभूमी व मारूती मंदिराजवळील मैदानावर हे पाणी आले असून स्मशानभूमी पाण्यात गेली आहे.
प्रचंड प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे निमसाखर, निरवांगीसह अन्य गावातील शेती मोठ्या प्रमाणात पाण्यात गेली असून, या पाचही गावांमधील सर्वसाधारण दोनशे ते अडीचशे एकरावरील शेत जमीनींमध्ये पुराचे पाणी जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, मका, डाळिंब आदि पिकांचे नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे.
- चिखली, कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोचीला फटका
चिखली, कळंब, निमसाखर, निरवांगी, खोरोची येथील सुमारे दोनशे ते अडीचशे एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतकरी व शेत पिकांचे मोठ्या नुकसान होणार आहे. या पूर्वी पडलेल्या दुष्काळी स्थितीमुळे आगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकरी पुराच्या पाण्यामुळे शेतकरी आणखीच चिंतातूर झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने या पिकांचा व फळबागांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.