कामाला मंजुरी असुनही उशीर लावल्याने नागरिक संतप्त
नीरा- गुळुंचे मार्गे मोरगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, रस्त्याच्या कडेची काटेरी झुडपे काढून रस्ता रहदारीला खुला करावा, या मागण्यांवर कार्यवाही न झाल्याने गुळुंचे (ता. पुरंदर) येथील नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पुरंदरच्या बांधकाम विभागासमोर उपोषण करण्यात आले.
गुळुंचे मार्गे पुढे नगर रस्त्याला मिळणाऱ्या मोरगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून गेल्या पंधरा वर्षांत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.
दरम्यान, तीर्थक्षेत्र विकास निधीतून यापूर्वी शिल्लक 110 मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित साधारण 800 मीटर रस्ता अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याच्या कडेने काटेरी झुडपे वाढल्याने प्रवासी तसेच नागरिकांची गैरसोय होत असल्याने ट्रस्टच्या वतीने दीड महिन्यांपूर्वी पुरंदर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, बांधकाम विभागाने या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही.
याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पत्र बांधकाम विभागाला आल्यावर बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेची झुडपे काढण्याबाबत ग्रामपंचायतीला काळविल्याचे पत्र ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण यांना दिले तसेच फोनद्वारे झुडपे कालच काढण्यात येतील असे सांगितले. मात्र, रस्त्याच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात न झाल्याने ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी व्यथित होत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण, उपाध्यक्ष संतोष जाधव, नारायण वाघमोडे, संदीप काळे, सचिन पाटोळे, सुरेश कुंभार, सुरज भंडलकर, मारुती भंडलकर, दत्तात्रय गोरगल आदी उपस्थित होते.
- रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून वर्क ऑर्डर होताच कामाला येत्या महिना अखेरीला सुरुवात करण्यात येईल. रस्त्याच्या बाजूची झुडपे काढण्याबाबत ग्रामपंचायतीला कळविले असून येत्या दोन दिवसांत झुडपे काढली जातील.
– सुधीर माने, अभियंता, बांधकाम विभाग जिल्हा परिषद, पुरंदर