इंदापूर तालुक्यातील भीषण वास्तव : यंदाचे वर्षे रखरखते जाणार
भवानीनगर- पावसाळ्याचे दिवस असतानाही इंदापूर तालुक्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. एकीकडे शेती पडीक पडली आहे. तर दुसरीकडे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने इंदापूर तालुक्यातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना सुकाळ आणि दुष्काळाच्या दुहेरी छटा अनुभवयास मिळत आहे.
इंदापूर तालुक्यात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही. जो पाऊस पडलेला आहे. तो अगदी तुरळक पडला आहे. तालुक्यातील लाकडी, निंबोडी, काझड, अकोले, निरगुडे, धायगुडवाडी, सणसर, सपकळवाडी, बेलवाडी, आदी गावांत पाऊस तुरळक झाला आहे. या भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस पडला नसल्याने विहिरींच्या पाण्याची पातळीही खालवली आहे. पुढील काळात शेतातील पिके कशी जगवावीत, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. देवघर, खडकवासला, गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याचा विसर्ग वीर धरणात होत आहे. वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात आले. वीर धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात नीरा नदीत सोडण्यात आल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली. क्षमतेपेक्षा जादा पाणी नदीत आल्याने इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसला आहे.
नीरा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तावशी, कुरवली बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा दिला होता. इंदापूर तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही. परंतु नीरेच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोनगाव, उद्धट, तावशी, कुरवली, कुरबावी, नीरा नरसिंहपूर, नदीकाठच्या इतरही गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परंतु इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नसला तरीही पूर मात्र आलेला आहे. यात इंदापूर तालुक्यातील शेतकरी सुकाळ आणि दुष्काळ या दुहेरी कात्रीत सापडला आहे.
इंदापूर तालुक्यातील स्थिती अजूनही पाण्याविना गंभीर आहे. निरगुडे, धायगुडवाडी, अकोले, वायसेवाडी भागातील शेतीला अजूनही पाणी नाही. इतकी विदारक अवस्था आहे. पावसाळ्यात ही स्थिती सध्या असेल तर उन्हाळ्यात शेतकरी पिके कशी जगवणार, हाच प्रश्न उभा ठाकला आहे. इंदापूर तालुक्यातील निम्मी गावे पाण्यासाठी व्याकूळ आहेत. ही वास्तवता राज्यकर्त्यांनी मनी वसत नाही.