पिंपरी – एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील पाराही वाढू लागला आहे. गेल्या आठवडाभरात तापमानानेही 39 अंशाचा पारा गाठला आहे. एका बाजूला करोनामुळे एसी, कूलरचा वापर करण्यावरही काही बंधने आली असल्यामुळे शहरवासिय उकाड्यामुळे हैराण झाले आहेत.
एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाल्यापासून खऱ्या अर्थाने तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील तापमान नवे-नवे उच्चांक गाठत असताना यावर्षी लांबलेला पाऊस, त्यातच सातत्याने अवकाळी हजेरी यामुळे मार्च महिन्यात उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवला नव्हता. मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र तापमानाने पुन्हा जोर वाढविला आहे. रविवारी हलक्या पावसाचा शिडकावा झाल्यामुळे उकाडा वाढला होता. तर सोमवारी तापमानाने 38 अंश सेल्सीयस पार केले. आज मंगळवारी हाच तापमाचा आकडा 39 वर पोहोचला होता.
सकाळी काहीसा गारठा, दुपारी कडक उन तर सायंकाळी ढगाळ वातावरण आणि उकाडा असा अनुभव शहरवासिय घेत आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वच जण घरात अडकून पडले आहेत. एसी, कूलर वापरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असल्यामुळे पंख्यावरच सर्वांचा भर आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास सहन करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
खंडित वीजपुरवठ्याने अडचण
सातत्याने वीजपुरवठा शहराच्या विविध भागात खंडित होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. तासन्तास वीज गूल होत असल्याने वाढलेले तापमान, घरात बसण्याची आलेली वेळ आणि उकाडा असा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
झोपडपट्टीतील रहिवाशांना मनस्ताप
दाट लोकवस्ती, बैठी घरे तसेच झोपडपट्टीतील नागरिक वाढत्या तापमानामुळे सर्वाधिक हैराण झाले आहेत. छोट्या घरातील मोठी लोकसंख्या, घरावरील पत्र्याची छप्परे आणि बाहेर पडण्यास असलेली बंदी तसेच सातत्याने जाणारी वीज यामुळे या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.