भावडी पाटी रस्ता खचला
पळसदेव- माळेवाडी ते भावडी पाटी रस्ता थोड्याशा पावसाने खचल्यामुळे नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. जवळपास 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण होते. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. रस्ता झाल्यावर अवघ्या तीनच महिन्यांतच या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ठेकेदाराने हा रस्ता करताना दर्जा राखला नसल्याने थोड्याशा पावसात खचला आहे.
जागोजागी या रस्त्याला खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर देखील निघून गेले आहे. नागरिकांतून मोठा संताप व्यक्त केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता दर्जेदार होत नसल्याने नागरिकांची प्रशासनावर नाराजी वाढत आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्या मतदारसंघातच निकृष्ट काम झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. एवढ्या वर्षानंतर रस्ता झाला असताना तो लवकरच खराब झाला आहे. त्यामुळे शेलारपट्टा, भावडी, चांडगाव, आगोती येथील नागरिक व विद्यार्थी पळसदेव येथे शिक्षण व इतर कामासाठी येतात. त्यांना खाचखळग्याचा सामना करावा लागत आहे. निकृष्ट काम केलेल्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेलारपट्टा, भावडी, आगोती व चांडगाव येथील नागरिकांनी केली आहे.