मुंबई : आस्मानी संकटाच्या गर्तेत अडकलेल्या राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने दिलासा दिला आहे. धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्याने सरकारकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
सन 2019-20 या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2019-20 मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.
भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसांत पीक विम्याची रक्कम मिळणार
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2019 मधील पीक विम्याच्या रकमेचे वाटप 12 डिसेंबर रोजी लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे विमा कंपनीला दिले. विधानभवनात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेच्या वितरणाबाबत अध्यक्षांनी बैठक घेतली. भंडारा जिल्ह्यातील एक लाख 61 हजार 343 धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यांनी 5 कोटी 43 लाख रुपये विम्याच्या हप्त्यापोटी जमा केले. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 67 कोटी 86 लाख रुपये मिळणार आहेत. प्रती हेक्टरी ही रक्कम 9 हजार 62 रुपये असेल अशी माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधीने यावेळी दिली.