जि.प.चे सभापती माने यांचा राज्य शासनाला सवाल
रेडा- इंदापूर तालुक्यातील दुष्काळी स्थिती आहे. यामुळे येथील चारा छावण्या बंद करण्याची घाई कशाला, असा सवाल सभापती प्रविण माने यांनी राज्य सरकारला केला असून शासनाने जर चारा छावण्या बंद केल्या तसेच तालुक्यातील पाझर तलाव भरण्यासाठी कानाडोळा केला तर मोठे जनआंदोलन उभे करून शासनाला जाग आणू, असा इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिला आहे.
इंदापूर येथील निवासस्थानी सभापती माने पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, चारा छावण्यांच्या माध्यमातून मोठा आधार मिळतो आहे. परंतु, या चारा छावण्यांची मुदत किमान दोन महिने तरी शासनाने वाढवली पाहिजे. छावण्यांना मुदत वाढ मिळाली नाही तर मुकी जनावरे जगणार कशी. चारा छावणी व तालुक्यातील पाझर तलाव हे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. शासनाच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू असल्याने मुक्या जनावरांना चारा व पाणी मिळते आहे, हेच बंद होणार असेल तर शेतकऱ्यांनी या जनावरांना चारा कुठून आणायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चारा छावण्यांची मुदत वाढवावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.
राज्यात एकीकडे पुराने थैमान घातलेले असताना काही जिल्ह्यातील गावात दुष्काळजन्य स्थिती आजही कायम आहे. यामध्ये इंदापूर तालुकाही आहे. नागरिकांना व जनावरांना पाणी पिण्यासाठी नाही. तालुक्यातील जुने पाझर तलाव पाटबंधारे विभाग व खडकवासला विभागाच्या माध्यमातून भरले तरच किमान नागरिकांच्या पिण्याचा व जनावरांचा पाणी प्रश्न निकाली निघेल; त्यामुळे संबंधित विभागाने पाझर तलाव तत्काळ भरावीत. तालुक्याला नैसर्गिक संपन्नता लाभलेली असून दोन्ही बाजूने नीरा व भीमा नदी असताना देखील शेतकऱ्यांच्या शेतीला व तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यामध्ये सरकारचे चुकीचे धोरण असल्याने तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांबद्दलची भूमिका आडमुठी असल्यामुळे तालुक्यातील शेती ओसाड होत आहे. पावसाळ्याचे दिवस असताना देखील गावागावात पाणी मिळत नाही. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो आहे. हे शासनाने जाणून घेतले पाहिजे, अशीही अपेक्षा सभापती माने यांनी व्यक्त केली.