ख्यातनाम बंडखोर लेखिका गौरी देशपांडे यांची आज जयंती. गौरी देशपांडे या लेखन करू लागल्यापासूनच चर्चेत राहिल्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुटलेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन अशा बहुविध प्रकारात त्यांचे लेखन झाले आहे. त्यांचा जन्म पुणे येथे 11 फेब्रुवारी 1942 रोजी झाला.त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पुण्याच्या अहिल्यादेवी प्रशालेत तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले.त्यांनी इंग्रजीमध्येसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. प्राप्त केली.
त्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा असलेल्या कर्वे घराण्यात जन्मल्या. महर्षी धोंडो केशव कर्वे यांची नात, तसेच प्रसिद्ध लेखिका व मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे व फर्गसन कॉलेजचे प्राचार्य दिनकर धोंडो केशव कर्वे यांची कन्या. त्यांचे चुलते र. धो. कर्वे भारतातील कुटुंब नियोजन मोहिमेचे आद्य प्रवर्तक. त्यांच्या ज्येष्ठ भगिनी जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका. अशा स्वतंत्र विचारसरणीची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांच्यावर आधुनिकतेचे संस्कार झाले होते. त्यांचे शिक्षण चालू असताना सामाजिक व शैक्षणिक सुधारणा होऊ लागल्या होत्या, ते काही जुन्या पिढीतील लोकांना मानवणारे नव्हते. दोन पिढीतील रीतिरिवाज यामध्ये वादविवाद सुरू होऊ लागले होते. यातूनच पुरोगामी विचारांना मूर्तस्वरूप येऊ लागले. याच वेळी स्त्री हा केंद्रबिंदू मानून त्यांनी त्यांच्या लेखनात बाईच्या स्वतंत्र असण्याची जाणीव करून दिली.
बिटवीन बर्थस् या इंग्रजी काव्यसंग्रहाने त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. 1968 मध्ये त्यांचा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्या लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. त्यावेळचे मराठी साहित्य मध्यमवर्गाशी निगडित राहिले होते. समाजाला आवडेल का, या भीतीपोटी मनात असूनही लेखक आडवळणाने आपली मते मांडत. पण गौरीताईंनी बेधडक आपली मते मांडण्यास सुरुवात केली. प्रेम, वात्सल्य या गोष्टी नैसर्गिक असल्याने स्त्री-पुरुष संबंधातील त्यांची मते टोकाची असायची. निरगाठी, चंद्रिके गं सारिके गं, मुक्काम, गोफ या कादंबऱ्यांमधून शरीरप्रेमाची स्वतंत्र परिभाषा त्यांनी मांडली. त्यांच्या कादंबरीची नायिका पतीची सेवा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजांबरोबर त्यांच्या भावनांप्रमाणे शरीराशीही प्रामाणिक असतात.
भारतीय संस्कृतीच्या परंपरेच्या बाहेरचे हे लिखाण असल्याचा प्रचार झाल्याने त्यातील दुसरी बाजू बऱ्याच वाचकांनी पाहिलीच नाही. त्यांच्या कथेतील कृष्ण हा नायिकेला समजून घेणारा दर्शविला आहे. नायिकेबद्दल मनात प्रेम, आदर, ममता असणारे, तिच्यावर जीव टाकणारे तसेच तिला तिच्या गुणांबरोबर अवगुणांसह प्रेम करणारे पुरुष त्यांच्या कथेचे नायक आहेत. सगळ्यात विशेष म्हणजे अरेबियन नाइट्सचे त्यांनी 16 खंडात भाषांतर केले. 1 मार्च 2003 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.
माधव विद्वांस