मुंबई – देशभर व्यापक स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरिपाचे यंदा बंपर पीक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या खरिपाच्या उत्पादनामध्ये किमान 5 ते 6 टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
21 ऑगस्टपर्यंतच्या नोंदीनुसार मान्सूनचे देशातील प्रमाण सरासरीच्या 7 टक्के अधिक आहे. त्यामुळे देशभर खरिपाची चांगली पेरणी झाली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादनाची शक्यता निर्माण झाली आहे, असे क्रिसिल संशोधन संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. खरिपाची पेरणी झालेल्या क्षेत्रातही दोन ते तीन टक्के इतकी वाढ झाली आहे. ही पेरणी एकूण 109 दशलक्ष हेक्टरवर झाली आहे.
चांगला पाऊस आणि कामावर परतलेले स्थलांतरित मजूर यामुळे भाताचे पीक यंदा चांगले येऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. अनेक राज्यांमध्ये सुरुवातीच्या काळात मजुरांचा अभाव ही एक समस्या होती पण नंतरच्या काळात मात्र याविषयीची स्थिती सुधारत गेली.
यंदाच्या खरीप हंगामातील उत्पादनांमध्ये नफ्याचे प्रमाणही किमान 3 ते 5 टक्क्यांनी वाढेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.