नदीत थेट जाणारे सांडपाणी थांबविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी – थेरगाव येथील केजुबाई बंधारा ते थेरगाव गणपती विसर्जन घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. यामुळे पाण्याच्या ऑक्सिजनची पातळी खालावली असून नदीमधील जलचर सृष्टी, मासे आणि इतर जलचर प्राणी यांचे जीवन धोक्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यामुळेच मासे मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले होते. नदीत थेट जाणारे सांडपाणी थांबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानेच पवना नदीची गटारगंगा झाली असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोग्य, पर्यावरण विभागाने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने निविदेद्वारे काढले आहे. संबधित ठेकेदाराला जास्तीच्या रकमेची निविदा काढली गेली आहे. मात्र गेले तीन वर्षे शहरातील पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम आज ही अविरतपणे चालू आहे.
यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस पडत होता यामुळे दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात येणारी जलपर्णी यंदा पहायला मिळाली नाही. ठराविक ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जानेवारी महिना संपत आला आहे, परंतु अद्याप जलपर्णीने संपूर्ण नदी व्यापली नाही, अन्यथा दरवर्षी जानेवारी महिन्यात जलपर्णी नदीपात्र झाकून टाकत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये पहायला मिळत आहे.
असे असतानाही तिन्ही नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने दोन कोटींची निविदा काढली आहे. ही करदात्यांच्या पैशाची लूट नाही का? विशेष म्हणजे नदीमध्ये ज्या ठिकाणी जलपर्णी साचली आहे त्याठिकाणी जलपर्णी काढण्यास संबधित ठेकेदाराला आदेश देऊनही ठेकेदराने काम सुरू केले नाही. मग ठेकेदाराला पैसे कशासाठी द्यायचे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाची उदासीनता- बांदल
गेले तीन वर्षे अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने नदीतील जलपर्णी काढण्याचे काम विविध स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरु आहे. स्वतःचा निधी वापरून अतिशय चांगले काम पवना नदीवर केले जात आहे, असे असताना प्रशासनाची उदासीनता दिसून येते. केजुबाई बंधारा येथील जलपर्णी लवकरात लवकर काढण्याचे काम महापालिकेने करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी जगदीश बांदल यांनी केली आहे.