पिंपरी – पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाने गेल्या सात वर्षांत संकटात सापडलेल्या तब्बल 299 प्राणी-पक्ष्यांना जीवदान दिले आहे. तसेच पंतगाच्या मांज्यामुळे अडकलेल्या शेकडो पक्षांचीही सुटका केली आहे.
आग विझविणे हे अग्निशमन दलाचे मुख्य काम असले, तरी मालमत्ता वाचविणे आणि जीवितहानी होणार नाही यासाठी अग्निशामक दलाचे जवान कार्यरत असतात.
केवळ माणसांचेच नव्हे, तर शेकडो प्राणी-पक्ष्यांचे जीव वाचवून कर्तव्य पार पाडले आहे. आपत्कालीन स्थितीत घरांत अडकलेल्या लोकांची सुटका करणे, विजेच्या खांबावरील वायरीच्या जंजाळात तसेच झाडावर अडकलेल्या पक्ष्यांची सुटकाही करण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करतात.
वाढत्या शहरीकरणाने भांबावून दुर्घटनाग्रस्त झालेल्या शेकडो प्राणी-पक्ष्यांना गेल्या सात वर्षांच्या कालावधीत दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले आहे. त्यांना सुखरूपपणे निसर्गाच्या वाटेवर नेऊन सोडले आहे.
पशू-पक्षी अडकल्याची घटना घडल्यानंतर नागरिक सर्वप्रथम अग्निशामक दलाला कळवितात. पूर्वी हे कॉल कमी प्रमाणात होते. प्रसारमाध्यमांमध्ये पशू-पक्षी वाचवल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून कॉल वाढले आहेत. प्राणी मित्रांसोबतच आम्ही देखील पशू-पक्षांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असतो.
– किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी