पिंपरी – उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने काकडी व लिंबांना मागणी वाढली आहे. मिरची, वांगी व गवारीचे दर वधारले आहेत. याशिवाय कांद्याच्या दरात प्रति क्विंटलमागे 100 रुपयांची किरकोळ घट झाली. मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. 20) 2409 क्विंटल फळभाज्या तर पालेभाज्यांची 51750 गड्ड्या आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली असली, तरी बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.
गेली पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 50 रुपयांवर पोचला आहे. टोमॅटोची आवक 125 क्विंटलने घटूनही दरात 100 रुपयांची वाढ झाली. बटाट्याची आवक 99 क्विंटलने घटूनही दरात 150 रुपयांची वाढ झाली. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने काकडी व लिंबांना मागणी वाढल्याने काकडीची 11 क्विंटल तर लिंबाची आवक 14 क्विंटलने वाढली आहे. मटारच्या आवकेमध्ये चढ-उतार होत असून, प्रतिकिलोचा दर 40 ते 50 रुपयांदरम्यान आहे.
मिरचीच्या दरातील तेजी कायम असून, 25 क्विंटलने आवक घटूनही दरात 1250 रुपयांची वाढ झाली असुन. प्रतिकिलोचा दर 80 रुपयांवर स्थिरावला आहे. आल्याची आवक वाढली असुनही दर मात्र 750 रुपयांनी घसरले. कारल्याची आवक 10 क्विंटलने घटूनही दरात 1000 रुपयांची घट झाली.फ्लॉवरची 153 क्विंटल आवक होऊन, दरात किरकोळ 50 रुपयांची घट झाली. तर कोबी, शेवगा व घेवड्याचे दर मात्र स्थिर राहिले.
गवारीची तीन क्विंटल आवक वाढून, दरात मात्र तेजी राहिली. भेंडीची 43 क्विंटल आवक होऊन, दरात 250 रुपयांची घट झाली.तर वांग्याची 42 क्विंटल आवक होऊनही दर वधारले. गाजराची 12 क्विंटल आवक वाढली असुन, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा भाव 20 ते 30 रुपये होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सर्वाधिक 1720 गड्ड्या आवक झाली. त्याखालोखाल मेथी 13650 गड्ड्या, पालक 7800 गड्ड्या, पदनिा 3200 गड्ड्या, हरभरा 2350 गड्ड्या, चवळी 1800 गड्ड्या, कांदापात व मुळ्याच्या प्रत्येकी 1750 गड्ड्या व शेपूच्या 1450 गड्ड्या आवक झाली. या सर्वच पालेभाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.