आमदार पाचर्णे यांचे आवाहन ः शिरूर येथे भिल्ल समाजाचा मेळावा
शिरूर-रामायणामध्ये शबरी मातेच्या व महाभारतामध्ये वीर एकलव्य यांच्या माध्यमातून भिल्ल समाजाच्या प्रामाणिकपणाची ओळख झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 30 टक्के निधी हा आदिवासी समाजासाठी असून या निधीचा फायदा घेण्यासाठी आदिवासी समाज मिळत नाही, अशी खंत यांनी व्यक्त करीत भिल्ल आदिवासी समाजाने जागृत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या म्हणीप्रमाणे आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे, असे प्रतिपादन शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले.
9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस जाहीर झाला असून यावेळी शिरूर तालुक्यातील भिल्ल आदिवासी समाजाचा मेळावा शिरूर साई गार्डन येथे आयोजित केला होता. यावेळी आमदार पाचर्णे बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे, शेतकरी संघटनेचे दादा पाटील फराटे, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब सरोदे, भिल्ल समाजाचे नेते बाळासाहेब माळी, शरद शेळके, पप्पू निकम, रवींद्र बर्डे, संदीप माळी, सोमनाथ गोलवड, उत्तम बर्डे, योगेश ओव्हाळ, उपस्थित होते.
शासनाने आदिवासी समाजासाठी नवीन कायदा केला असून जी जमीन हा समाज कसत आहे त्या जमिनीवर त्या आदिवासी समाजाचे नाव यापुढे लागणार आहे. पंतप्रधान आवास योजनेमधून झोपडी तेथे पक्के घर अशी मोदी सरकारची योजना असून या योजनेचा फायदा आदिवासी समाजाने घ्यावा, असे आवाहनही आमदार पाचर्णे यांनी केले.
आदिवासी समाजाचे संदीप माळी म्हणाले, आदिवासी समाजासाठी शासनाच्या अनेक योजना असून या योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी हा समाज शिकला पाहिजे. कारण हा समाज 70 टक्के अडाणी असून या समाजाच्या अनेक अडचणी आहेत.
पप्पू निकम म्हणाले, भिल्ल आदिवासी समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत अडाणी आहे. समाजाच्या अनेक मूलभूत अडचणी सोडवण्यासाठी शासनाने या समाजाला रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला मिळण्यासाठी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. भिल्ल समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह उपलब्ध करून द्यावे. 9 ऑगस्ट आदिवासी दिवसानिमित्त शिरूर शहरातून वीर एकलव्य यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी भिल्ल कक्रांतिकारक नेत्यांची प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.