लोणी काळभोर (वार्ताहर) – येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नाव बदलून वीज बंद कंपनी करावे, असा उपरोधिक सल्ला लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांमधील नागरिकांनी दिला आहे. कडक उन्हाळ्यात अनेकदा वीजपुरवठा बंद ठेवण्यावरच कंपनी सध्या जोर देत आहे.
त्यामुळे या दोन्ही गावांमधील नागरिक प्रचंड वैतागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही पक्षाचा, कुठलाही स्थानिक नेता या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने नागरिक वीज वितरण कंपनी बरोबरच नेत्यांवरही चिडून आहेत.
गेले काही दिवस पुणे शहर व परिसराचे तापमान 41 ते 42 अंशापर्यंत पोचले आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील रहिवाशी भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळ पासूनच वीजपुरवठा न सूचना देता खंडित केला जात आहे. साधारणत: तीन ते पाच तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या गुरुवारी तर तब्बल 18 – 19 तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
यामुळे अपार्टमेंट-सोसायट्यांमध्ये व इतरत्रही पिण्याच्या व घरात वापराच्या पाण्याच्या प्रश्न उद् भवत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यातच वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके सुकू लागली आहे. सतत भारनियमन, दुरुस्तीच्या कामामुळे वीजप्रवाह वारंवार खंडित होण्याचे प्रमाण आणि बाकी इतर कारणांमुळे कायमच वीजपुरवठा बंद असतो.
देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येक गुरुवारी विद्युत पुरवठा खंडित केला जातो. तरी देखील अनियमित वीजपुरवठ्यामुळे अनेकांना इन्व्हर्टर सारख्या उपकरणांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन देखील भरमसाट वीजबील येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने कित्येक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. दैनंदिन जीवनशैलीवर याचा परिणाम होत आहे. रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरातील नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. या भागात डासांचा प्रादूर्भाव असल्याने रात्रीची झोप उडाली आहे. दिनचर्यवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे महावितरणाने वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील नेमक्या अडचणी काय आहेत याची माहिती घेऊन त्या तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आगामी काळात नागरिकांना वीजेअभावी त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. -राजेंद्र पवार, मुख्य अभियंता वीज वितरण कंपनी