अरुण गोखले
एकदा काय झाले एका गुरूंकडे त्याचे दोन शिष्य आले. त्यांनी गुरूदेवांचे दर्शन घेतले आणि तिथेच बैठक टाकली. तेव्हा गुरूंनी त्यांना विचारले, “”काय रे बाबांनो! काही काम आहे का? तुम्हाला काही विचारायचे आहे का? काही हवं आहे का?” त्यावर पहिला शिष्य पुढे झाला. त्याने विचारले, “”महाराज मी माझं दैन्य, गरिबी दूर होण्यासाठी काय करू?’
तर दुसऱ्याने विचारले, “”गुरूदेवा! मी माझं पाप नाहीस व्हावं. पुण्य पदरी पडावं म्हणून काय करू?”
सद्गुरूंनी त्या दोघांचे प्रश्न ऐकले. त्यावर थोडा विचार केला आणि त्यांनी पहिल्या शिष्याला सांगितले की, तू काम कर. मग दुसऱ्या शिष्याकडे वळून ते त्यास म्हणाले, हे बघ, तू राम म्हण.
त्या दोन्ही शिष्यांना एकास “काम कर’ तर दुसऱ्यास “राम म्हण’ हा गुरूबोध मिळाला. दोघांनी आनंदाने सद्गुरूंच्या पायावर डोके टेकले आणि दोघेही उठले.
एकीकडे ते दोघेही विचार करत होते की, आपल्या सद्गुरूंनी आपल्या हे असं एकाला काम करा आणि दुसऱ्याला राम म्हणा असं का बरं सांगितलं असेल?
त्यांनी जेव्हा त्या गुरूमंत्रावर थोडा गांभीर्याने विचार केला. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, आपल्या सद्गुरूंनी आपल्या हिताचाच बोध केलेला आहे. कारण, काम कर याचा अर्थ असा की, कष्ट कर. मेहनत कर. तू तुझ्या मनातलं नैराश्य, निराशा दूर ठेव. कष्टाचा घाम गाळला की, सुखाचे मोती हे ओंजळीत येणारच. उद्योगशीलता जिथे आहे तिथे ती श्रमलक्ष्मी ही येतेच. जिथे लक्ष्मी येते तिथे मग दारिद्य्र, दैन्य राहातच नाही.
काम कर याचं जसं हे मर्म आहे तसंच ते त्या राम म्हण या बोधाचंही. कारण, राम हे नाम स्वयंसिद्ध आहे. ते पापांच्या राशी जाळून टाकणारे आणि उपासकाच्या पदरात पुण्याची शिदोरी बांधून देणारे आहेच. जिथे कामाची रामाशी जोडणी केली जाते तिथे तर दामाबरोबरच सुख, सौख्याचा आराम हा मिळतोच.