नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणशिंगणे फुकण्यात आली असताना कॉंग्रेसच्या गोटात अद्यापही शांतताच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी खुद्द कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मैदानात उतरणार असल्याचे समजते. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त वर्धा येथील गांधी आश्रमातून ते पदयात्रेला प्रारंभ करण्याची शक्यता आहे.
महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमीत्त कॉंग्रेस नेत्यांच्या संपूर्ण देशभर पदयात्रा काढण्यात येणार आहेत. या निमित्ताने राहुल गांधी हे अज्ञातवासातून अखेर बाहेर येणार असून 2 ऑक्टोबरला वर्ध्यातल्या गांधी आश्रमातून ते पदयात्रेला सुरुवात करण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाच्या 18 दिवस आधी राहुल गांधी महाराष्ट्रात दिसणार आहेत. राहुल गांधी पदयात्रा काढत कॉंग्रेसच्या प्रचारासाठी नारळ फोडणार असल्याची देखील चर्चा आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमीत्त सोनिया गांधी दिल्लीत, राहुल गांधी महाराष्ट्रातल्या वर्धामध्ये तर प्रियंका गांधी हरियाणामध्ये पदयात्रा काढणार आहेत.