अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर ः करंदीत करपलेल्या पिकांची पाहणी
केंदूर-आजपासून करंदी परिसरात करपलेल्या पिकांचे ग्रामसेवक, कामगार तलाठी आणि कृषी सहायक अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून पंचनामे सुरू करण्यात आले आहे. करंदी परिसर हा नेहमी हिरवा परीसर पाहायला मिळायचा चासकमान धरणाचा कालवा करंदी गावच्या मध्यभागातून गेल्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध झाले; परंतु या वर्षी संपूर्ण तालुक्यात दुष्काळ परिस्थिती ओढवली. चासकमान धरण यावर्षी शंभर टक्के भरूनदेखील पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोलमडले. त्यामुळे मेच्या पहिल्याच आठवड्यात पाण्याचा तुटवडा भासू लागलो. त्यामुळे फळबागांसह उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सर्व पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. दरम्यान आज कृषी सहायक अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे आज शेताच्या बांधावर जाऊन पाण्याअभावी करपलेल्या पिकांची पाहणी करून थेट शेताच्या बांधावर तहसीलदार यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फॉर्म भरून घेण्यात आले. कृषी सहाय्यक अधिकारी सारिका काळे, तलाठी संदीप शिंदे आणि उपसरपंच गोरक्ष ढोकले उपस्थित होते.
- सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून होणाऱ्या पंचनामासाठी सहकार्य करावे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत.
-दिलीप पानसरे, ग्रामसेवक करंदी