जयेश राणे
मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या कुटुंबीयांकडून टोकाची पावले उचलली जाण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. त्यामुळे विवाह या नाजूक सूत्राविषयी मंथन होणे आवश्यक ठरते. मुलीचा विवाह करून देण्याविषयी पालकांच्या काही संकल्पना असतात. मुलगी दुसऱ्या घरात जाऊन त्यांचा वंश वाढवणार असते, असे चक्र चालूच असते. मात्र, युवक-युवती अल्प वयातच एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर त्या भावनिक गुंत्यातून एकमेकांना सोडत नाहीत. विशेषतः मुलीच्या कुटुंबीयांना हे कळल्यावर ते अस्वस्थ होतात.
आपल्या पोटच्या मुलीने “असे काही’ केल्याचे कळल्यावर प्रसंगी कायदाही हातात घेण्यास पालक कचरत नाहीत. किंबहुना त्या विचाराच्या ओघात कायदा हातात घेतला जातो. अशा गोष्टी वरकरणी दिसण्यास साध्या दिसत असल्या तरी एखाद्याच्या मनात निर्माण झालेला राग काय करू शकतो हे ही लक्षात येते. युवक-युवती यांना अल्पवयात एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होते. हे आकर्षण म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण असते, हे कोणीही सांगेल. शारीरिक आकर्षणातून एकमेकांविषयी ओढ निर्माण झालेली असल्याने विवाह करणे, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे अशा गोष्टी केल्या जातात. पैकी विवाह ही फार मोठी गोष्ट आहे. विवाह म्हणजे काही खेळ नाही. पण याकडे बहुतांश युवक-युवती खेळ म्हणूनच पाहात असतात. विवाह म्हणजे काय? याविषयी माहिती करून घेणे आणि त्याविषयी गांभीर्य बाळगणे असा विचारही होताना दिसत नाही. एकमेकांविषयी आकर्षण संपले की टोकाचे वाद चालू होतात. मुलगी आपल्या आई-वडील यांच्या घरी परतते आणि मुलगा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी जाण्यास सिद्ध नसतो. असा एकंदरीत भाग होतो.
थोडक्यात, आपले एक अविचारी पाऊल किती त्रासदायक गोष्टी निर्माण करते, हे चटकन लक्षात येते. पण हे लक्षात कधी येते, तर कठीण प्रसंगातून जावे लागल्यावरच! समाजात अशा घटना आजमितीस नव्याने घडत आहेत, असे अजिबात नाही. घटना जुन्या आहेत. आजमितीस त्यांचे प्रमाण मात्र वाढलेले आहे. प्रसंग हे शिकण्यासाठी असतात. मग ते वैयक्तिक जीवनातील असो वा व्यावसायिक जीवनातील. त्यांच्याकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहिले नाही, तर उद्या त्या प्रसंगातून जावे लागल्यावर त्याला धैर्याने तोंड कसे द्यायचे? हे सूचत नाही. त्यावेळी गोंधळल्यासारखी स्थिती होऊन चुकीचे निर्णय घेतले जातात आणि काहीतरी अघटित घडते.
कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध मुलीने विवाह केला आणि तिला सासरी नांदण्यात अडचण येत असेल, तर अशा प्रसंगी मुलीच्या कुटुंबीयांचा संताप अनावर होतो. त्याचा राग पोटच्या मुलीसह सासरच्या मंडळींविरुद्धही निर्माण होऊन त्याचा विस्फोट कधी, कोणत्या स्वरूपात होईल हे सांगता येणे कठीण असते. नातेवाईक, शेजारी, राहता विभाग, मित्र-मैत्रिणी आदींत चर्चा होऊ लागते. त्याची उत्तरे पालकांना द्यायची असतात. त्यामुळे मुलगी माहेरी का आली? एवढे दिवस झाले तरी ती सासरी का जात नाही? ती सासरी कधी जाणार? असे एक ना अनेक प्रश्न असतात. काही मंडळी जखमेवर मीठ चोळावे तसे, हे प्रश्न मुलीच्या पालकांना विचारून, त्यांना त्रास देऊन त्यातून विकृत समाधान घेत असतात. असा प्रकार करणाऱ्यांना आपण काहीतरी काम केल्यासारखे वाटत असते. पण ते काम नसून दुसऱ्याच्या मनातील राग जागृत करण्यास घालण्यात आलेले ते खतपाणी असते. त्या रागाच्या भरातच चुकीचे पाऊल उचलून मुलीला कुटुंबीयांकडूनच लक्ष्य केले जाते. सांगण्याचे तात्पर्य हेच की मुलीचा एक चुकीचा निर्णय कोणता प्रसंग ओढवून घेतो, ते लक्षात येते. त्यामुळे सर्वंकष विचार करूनच विवाहयोग्य जोडीदार निवडणे हितावह ठरते. अन्यथा स्वतःसह कुटुंबीयांनाही प्रचंड मानसिक तणावातून जावे लागते.
अमुक व्यक्तीसह आपले विचार जुळत असल्याने आपण तिच्यासह नेहमी समाधानी राहू शकतो, असे वाटत असते. त्यामुळे अल्प वयात विवाहासारखा निर्णय घेतला जातो. विचार जुळणे आणि शारीरिक आकर्षण यांत भेद आहे. विचार जुळत असल्यास नंतर टोकाचे वाद होत नाहीत. छोट्या कुरबुरी असणे, हे ओघाने आलेच. मात्र विचार जुळत असल्यावर टोकाचे वाद होऊन वेगळे होण्याचा विचारही मनाला स्पर्श करत नाही. असे असल्याने आपण ज्या व्यक्तीसाठी विवाहासारखा मोठा निर्णय घेत आहोत, त्या व्यक्तीविषयी असलेले आकर्षण नेमके कोणत्या स्तरावरचे आहे? याचा विचार झाला पाहिजे. थोडे थांबून केलेला विचार भविष्यातील मोठ्या आघातापासून रक्षण करू शकतो. प्रेम प्रकरणातून युवतीवर ज्वलनशील पदार्थांनी आक्रमण करणे, हत्याराने वार करणे, नाहक अपकीर्ती करणे, अपकीर्ती करण्याची धमकी देऊन शारीरिक सुख, तर कधी पैशांचीही मागणी करणे आदी गोष्टी केल्या जातात. या सर्वांमध्ये युवतीच बळी पडत असते. युवक मात्र मोकाट असतो, हे येथे लक्षात घ्यावे. त्यामुळे युवतींनी किती सतर्क राहायला पाहिजे? हे वेगळे सांगायला नको. मुलाची पावले चुकीची पडल्यास त्याकडे कानाडोळा केला जातो. कालांतराने लोक त्याने केलेल्या गोष्टी विसरूनही जातात. मात्र मुलीकडून काही चूक झाली, तर ती कायम लक्षात राहते. त्याचे बोल पालकांना लावले जातात.
पालक तळहातावरील फोडाप्रमाणे जपणूक करत पालन-पोषण करण्यात कोणतीही कमतरता ठेवत नाहीत. आपल्याला कोणीतरी आवडू लागले की, चौकसपणे विचार न करता थेट त्या युवकासह आयुष्याची गाठ बांधण्याचा विचार पक्का केला जातो. मुलगी स्वतःच्या जीवाचे काहीतरी करून घेईल म्हणून काही पालक मुलीच्या सुखात आपले सुख मानतात. मात्र, जेव्हा त्याच सुखाचे रूपांतर कालांतराने दु:खात होते, तेव्हा मात्र ते पूर्णपणे खचतात. याचा विचार होईल का?