नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातच आम्ही बहुमताचा आकडा ओलांडला आहे असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ते म्हणाले की आता विरोधकांना दिल्लीत येऊन बैठक घ्यायची असेल तर त्यांना विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठीच बैठक घ्यावी लागेल. ते म्हणाले की सातव्या टप्प्याचे मतदान जेव्हा पुर्ण होईल त्यावेळी आम्ही तीनशेचा आकडा पार केलेला असेल असा दावाही त्यांनी केला आहे.
येत्या 19 तारखेला लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. टीआरएस पक्षाच्यावतीने तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची एकत्रित बैठकही आयोजित करण्यात आली आहे, त्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की असल्या खेळ्यांचा आमच्या यशावर काहीही परिणाम होणार नाही. ते फार तर विरोधी पक्ष नेता कोणाला करायचे हे ठरवण्यासाठी बैठक करू शकतात. त्यांना यावेळीही विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक असणारे संख्याबळ गाठता येणे कठीण आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.
लोकसभेतील एकूण संख्याबळाच्या दहा टक्के जागा मिळवणाऱ्या पक्षाला लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा मान मिळतो पण सन 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला तेवढ्याही जागा मिळू शकल्या नव्हत्या त्यांना केवळ 44 जागाच मिळाल्या होत्या त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचाही मान मिळू शकला नव्हता.