शिरूर – शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील एलजी कंपनी, करंदी येथील ओरिएंटल रबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हायर अप्लायन्स कंपनी आणि सनसवाडी येथील प्रांज कंपनी या चार कंपन्यांचे व्यवस्थापन व स्थानिक ठेकेदार गुंडाना हाताशी धरून दहशत निर्माण करत कंपनीतील कामगारांना त्रास देत त्यांच्याकडून राजीनाम्याची मागणी करत आहेत. हा प्रकार वारंवार होत असून पोलिस प्रशासनात तक्रार देऊन कुठलीही कारवाई होत नसल्याने याच्या निषेधार्थ चार कंपन्यातील कामगारांनी एकत्र येत आज शिरूर तहसील कार्यालयावर दीड हजार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळावा अशी मागणी करत दिवसभर धरणे आंदोलन केलं.
यावेळी शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना यासंदर्भात मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी या कामगारांचे कुटुंबीय व दीड हजार कामगार उपस्थित होते. यावेळी बोलताना शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी 25 जुलै रोजी वरील चारही कंपन्यांचे व्यवस्थापन, पोलीस अधीक्षक,कामगार यांची संयुक्त बैठक आयोजित केल्याचे सांगितले आहे.