बीड जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत पडले कोरडे
राहुरी – पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागल्याने तसेच पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने शेजारच्या बीड जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरचे स्रोत आता थेट मुळाधरण झाला आहे. बुधवारपासून दररोज 45 पिण्याचे पाण्याचे टॅंकर मुळाधरणातून भरले जात आहेत.
बीड व नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरीनंतर टॅंकरने बीडला पाणीपुरवठा सुरु झाला आहे. बीड जिल्ह्यात टॅंकर भरण्यासाठीचे स्त्रोत कोरडे पडल्याने थेट नगर जिल्ह्यातून आता बीडला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. मुळाधरणाच्या इतिहासात अशी परिस्थिती प्रथमच उद्भवली आहे. बीडचे टॅंकर पाणी भरण्यासाठी मुळा धरणावर आले असता टॅंकर भरून देण्याची व्यवस्था करण्यात पाटबंधारे विभागाची बरीच धावपळ झाली. वीजमोटारी, पाईपची जुळवाजुळव करावी लागली. मुळा धरणात सध्या मृतसाठ्यासह 5 हजार 100 दशलक्ष घनफुट पाणीसाठा असून तो गतवर्षी पेक्षा थोडासा जास्त आहे.
धरणातील साठा गतवर्षी या वेळेस 4 हजार 800 दशलक्ष घनफूट होता. धरणातील सर्वच पाणीसाठा जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी राखीव केला आहे. आमदार सुरेश धस व सभापती रमजान तांबोळी यांनी मुळा धरणावरील व्यवस्थेची पाहणी केली. गुरुवारी पाच टॅंकर पाणी भरण्यासाठी महापालिका पंपाजवळ प्रतीक्षेत होते. शाखा अभियंता आण्णासाहेब आंधळे यांनी एम.आय.डी.सी अभियंता राठोड यांचेशी चर्चा केली. एम. आय. डी. सी च्या पंपीग स्टेशनहून टॅंकर भरण्यात आले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा असून अजून नव्याने पाणी अजिबात आलेले नाही.