पुणे – आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेत देशातील पहिल्या शंभरमध्ये पुण्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज आर्यन अगरवाल आणि मुस्तफा ईब्राहिम चासनाई या विद्यार्थ्यांनी शंभर रॅंकमध्ये स्थान मिळविले आहेत.
देशातील नामवंत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी प्रवेशासाठी जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत गतवर्षी पुण्यातील 300 विद्यार्थी पात्र ठरले होते. यंदा मात्र 400 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरल्याचे दिसून येत आहे. राज अगरवाल हा राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा विद्यार्थी आहे.
त्याने जेईई मेन परीक्षेत 100 पर्सेटाईल मिळविले होते. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात 100 गुण प्राप्त केले होते. मुस्तफा चासनाई हा स. प. महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. बारावीला त्याला 89 टक्के गुण मिळाले आहेत. या दोघांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेऊन इंजिनिअर व्हायचा मनोदय व्यक्त केला आहे.
यंदा जेईई ऍडव्हान्स परीक्षेची पातळी अवघड होती. त्यातुलनेत यावर्षी आयआयटी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचा कटऑफ घसरेल, अशी शक्यता होती. मात्र, मागील वर्षीप्रमाणे यंदाही कटऑफ 93 इतका राहिला आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला असून, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल.
– प्रा. दुर्वेश मंगेशकर, प्रवेश परीक्षा मार्गदर्शक